Tuesday, January 7, 2014

जीवन म्हणजे एक प्रचंड मौज आहे


दहा वर्षांपूर्वीं ‘मी कसा झालो?’ हे माझे ‘वाङमयीन आत्मचरित्र’मी प्रसिद्ध केले. आज माझ्या जीवन-चरित्राचा पहिला खंड प्रसिद्ध होतो आहे. त्यामध्ये जन्मापासून तो वयांच्या तिसाव्या वर्षापर्यंतच्या वृत्तांत मी सांगितलेला आहे. असे निदान आठदहा तरी खंड प्रसिद्ध होतील. मराठी भाषेतच काय, पण जगामधील कोणत्याहि भाषेत एका माणसाचे  एवढे मोठे आत्मचरित्र प्रसिद्ध झाल्याचे मला तरी निदान माहित नाही.
     
कोणी विचारील, की एका लहान माणसाने इतके मोठे आत्मचरित्र काय म्हणून लिहावे? त्याला उत्तर असे की, ह्यात ‘मी’ला महत्त्व नाही. गेल्या पन्नास वर्षांत महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ऐतिहासिक, राजकीय, सामाजिक आणि वाङमयीन घडामोडी घडल्या, त्यांच्या इत्थंभूत वृत्तांत सांगण्यासाठी ‘आत्मचरित्र’ हे एक माझे निमित्त आहे. हे मराठी सामाजाचे चरित्र आहे. मी पाहिलेलया, मी ऐकलरल्या आणि मी अनुभवलेल्या अनेक व्यक्तीचे, घटनांचे, गोष्टींचे आणि अनुभवांचे हे चरित्र आहे. माझे काम पुष्कळसे प्रेक्षकाचे आणि निवेदकांचे आहे.
     
‘तुम्ही कोण?’ असे कोणी म्हणेल. मी कोण? मी एक जीवनाचा यात्रेकरु आहे. कसली वा कसली तरी पताका माझ्या खांद्यावर नेहेमी असतेच. जन्मापासून माझ्या पायाला जे  एकदा चक्र लागले आहे. ते एकसारखे फिरतेच आहे. कोणत्याहि एका ठिकाणी मी फार वेळ थांबत नाही. जिथे रंगतो, तिथे काही वेळ थांबतो. कंटाळलो की पुढे चालू लागतो.
     
कोणत्याहि एका व्यवसायांत मला रस नाही कारण, व्यवसाय हे काही माझें जीवन नाही. जीवन हाच माझा व्यवसाय आहे. जीवनाची मला विलक्षण जिज्ञासा आहे. सारे मला दिसले पाहिेज, सारे मला समजलें पाहिजे? सारे मला आले पाहिजे, ही एकच माझ्या जिवाची तडफड असते.
     
आयुष्याला जीवन का म्हणतात? कारण, जीवन म्हणजे पाणी. आयुष्य हे पाण्याप्रमाणे सारखे वहात राहिले, तरच ते जीवन.सांचून राहिलर तर ते डबके जीवन म्हणजे एक प्रंचड मौज आहे. तिचा कितीहि आस्वाद घ्या. कंटाळा कधी येत नाही आणि तृप्ति कधी होत नाही.
     
रोज सकाळी सूर्योदयाबरोबर नवीन जीवन जन्माला येते. चिरंतन नावीन्य म्हणजेच जीवन. जीवनाच्या आकर्षणाला अंत नाही. मला जीवनाचा लोभ नाही पण ओढ आहे. चोहोकडून मला ते हाका मारते. आणि त्या ऐकू आल्या म्हणजे शाळेतून सुटलेल्या पोराप्रमाणे सारे देहकण जीवनाकडे धावत सुटतात.
     
जीवनाचे हे विलक्षण वेड  माझ्यामध्ये कसे आले? लहानपणापासून निसर्गाचूी अन् इतिहासाची मला सोबत मिळाली. ब्रह्मदेवाच्या कमंडलूतून उगम पावलेल्या कर्‍हेच्या कांठी मी जन्माला आलो. आणि तिच्याच अंगाखाद्यावर जेजूरीच्या खंडोबाच्या भंडार्‍याने वाढलो. मोठा झालो. उशाला शिवाजीमहाराजांचा पुरंदर किल्ला आष्टौप्रहर पहारा करी. तर श्री सोपानदेवांची भक्तिवीणा शेजारी सदैव वाजे.
     
शक्तीचे आणि भक्तीचे पावनतीर्थ होते माझे सासवड गांव. महाराष्ट्रातील संताच्या नि वीराच्या पदस्पर्शाने त्याचया भूमीचा कण न् कण पुनीत झालेला आहे. शिवशाहीचा नि पेशवाईचा महत्त्वाचा इतिहासच मुळी त्याच्या पंचक्रोशीत घडलेला आहे. आजहि सासवडच्या रस्त्यांतून जाऊ लागले. की उंच उंच वाडयांच्या पडक्या भितीवरुन दोनतीनशे वर्षांचा इतिहास तिमच्या कानांत कुजबुजू लागतो. ज्ञानोबाची पालखी दर वर्षीं सोपानदेवाचे दर्शन घेऊनच पुढे पंढरीला जाते. त्यावेळी आमच्या गावात दिड्यापतकांची अशी गर्दी उडते आणि टाळमृदुंगाच्या नि ग्यानबातुकारामांच्या गजराने सारे शिवार असे दुमदुमते म्हणत! बालपणांत झालेल्या ह्या सर्व संस्कारांनी माझा पिंड घडविलेला आहे.
     
जे रम्य आणि भव्य आहे, त्याचें सर्धन खेडेगांवातच घडते. पावलोपावली परमेश्वर तुमच्याशी बोलत असतो तिथे. त्याची कृपा नदीच्या रुपाने तुमच्या घराजवळून वहात असते. शिवारामधल्या शेतांत डोलणार्‍या पिकावरचा वारा परमेश्वराचा सुवासिक श्र्वासच प्रतिक्षणी घेऊन येतो. शहरांत रहावयाला आलो, तरी निसर्गाची संगत मी कधीच सोडलेली नाही. मुंबईचा सागर आणि खंडाळयाचा डोंगर हे माझे सोबती आहेत.
     
जीवनाच्या आनंदामधूनच माझे वाङमय वेड निर्माण झाले आहे. वाङमयापेक्षा मला अधिक प्रिय काही नाही. वाङमय म्हणजे जीवनाचा अनुभव. जीवनाचा शोध जीवनाचे जेजे अनंत साक्षात्कार मला घडले, ते प्रकट करण्यासाठींच मी वाङमयाचा आसरा घेतला. मी आयुष्यांत पुष्कळच भटकलो. पण वाङमयाची सोबत कधी सोडली नाही. जीवनाची सेवा मी वाङमयाने केली.
     
मी उपदेशक नाही. उपासक आहे. सिद्ध नाही. साधक आहे. समाजातील अनंत दुःखाची आणि दन्यांची मला जाणीव आहे. त्यांजवर फुंकर घालण्याचाच माझ्या लेखणींने मी सतत प्रयत्न केला आहे. रंजल्यागांजल्याचा कैवार घेण्यांतच मी माझे सामर्थ्य खर्च केले आहे. जगातील म्लान वदने प्रफुल्लित कशी होतील ह्याचीच मी सदैव चिंता केली आहे. माझ्या दोषांची आणि चुकींची मला जाणीव आहे. पण सज्जनांच्या निदेचे पाप माझ्या हातून कधी घडलेले नाही. लोकगंगेचे जीवन गढूळ करण्याचे दुष्कर्म मी कधी केलेले नाही.
     
मी गुणांचा पूजक आहे. हे माझे सर्वांत मोठे सामर्थ्य आहे. भुंगे जसे फुलांवर झेप घेतात, तसे गुण मला दिसले रे दिसले की मी त्यांजवर तुटून पडतो. चांगल्या गोष्टीवर प्रेम करण्याची मला उपजतच आवड आहे. सद्गुणांच्या दाराशी जन्मभर मी जी माधुकरी मागितली, त्याच शिदोरीवर आजपर्यंत मी गुजराण करीत आलो आहे.

कर्‍हेचे पाणी
आचार्य प्रल्हाद केशव अत्रे

No comments:

Post a Comment