Wednesday, November 24, 2010

टिल आय डाय आणि इतर अविस्मरणीय कथा (अनुवाद - श्रीनिवास पटवर्धन)

ऍडम लंडनहून आला, त्याला आणण्यासाठी सेलेस्ट विमानतळावर गेली होती.  दोघेजण आले ते थेट डॅमनच्या रूमवर गेले.  दोघे भाऊ एकमेकांच्या मिठीत मनसोक्तपणे रडले.  दोनच दिवसात डॅमनच्या वेदना इतक्या वाढल्या की द्रवरूप मॉर्फिननेही त्या कमी होईनात, आम्ही लगेच डॅमनच्या खास दोस्तांना फोन करून बोलावून घेतलं.  दुसर्‍या दिवशी टॉबी आला.  त्यानंच सेलेस्टशी डॅमनची ओळख करून दिली होती.  आता सेलेस्ट म्हणजे त्याची जीव की प्राण होती.

१ एप्रिल १९९१, एप्रिल फूलचा दिवस! पहाटे लवकर उठून मी नेहमीप्रमाणे धावण्याचा व्यायाम करण्यासाठी बीचवर गेलो.  थोड्याच वेळात पूर्वेला आभाळाला लाली यायला लागली होती.  माझ्या डोळ्यांसमोर लहानपणीचा गुलाबी, गोबरा डॅमन उभा राहिला.  ते मनोहर दृश्य पहात असतानाही माझे डोळे भरून आले.  जितक्या वेगात धावता येईल तितक्या वेगानं मी घराकडे धावलो.  शेवटी असं वाटायला लागलं की माझा ऊर फुटतोय की काय!  घरी येऊन थेट गच्चीत गेलो.  अश्रू आवरेनात.  मी पोटभर रडून घेतलं.  खाली आलो.  कॉफी बनवली अन् बेनिटाला उठवलं.  ब्रेटला बोलावून घेतलं. 

आम्ही सगळेजण सिटींगरूममध्ये बसलो होतो.  मूकपणे आम्ही परमेश्वराजवळ प्रार्थना करीत होतो की डॅमनचे अखेरचे क्षण त्याला सुसह्य होवोत!  सेलेस्ट डॅमनजवळ बसून त्याचं मनोधैर्य वाढवायचा प्रयत्न करीत होती.  सूर्याची सोनेरी किरणं सिडनेला प्रकाशमान करीत होती, अन् इकडे आमच्या वंशाचा दिवा विझत चालला होता!  आम्ही आलटून पालटून डॅमनजवळ बसून त्याचा अखेरचा निरोप घेत होतो.  इतक्या वेळ आवरलेले अश्रू अखेर गालावरून ओघळलेच.

त्याही अवस्थेत डॅमननं माझे हात हातात घेतले अन् क्षीणपणे हसून म्हणाला, "धन्यवाद डॅड! आजवर तुम्ही माझ्यासाठी जे केलंत त्याचे पांग मी फेडू शकलो नाही.  माझं तुमच्यावर अपार प्रेम आहे."

डॅमनने अखेरचा श्वास सेलेस्टच्या बाहुपाशातच घेतला.  तिला शेवटी डॅमनला गमवावंच लागलं!  तो कुणी संत महंत नव्हता पण त्याच्या आयुष्याचा आलेख असामान्य होता!  त्यानं आम्हाला आयुष्यावर, माणसांवर प्रेम करायला शिकवलं.  प्रत्येक क्षण तो खर्‍या अर्थानं जगला.  त्यानंतर काही दिवसांनी डॅमनचे डॉक्टर आम्हाला मुद्दाम भेटायला आले.  आता ते आमच्या घरातलेच झाले होते.

ते म्हणाले, "ब्राईस, डॅमन हा माझ्या करिअरमध्ये, मी पाहिलेला पहिला असामान्य पेशंट होता! त्याला वीराचं मरण आलं.  पराभव पत्करायच्या आधी त्याने अठरा वर्ष प्रत्यक्ष मृत्यूशी झुंज दिली!"

Sunday, October 31, 2010

सोळा आणे (लेखक - चिं. वि. जोशी)

गैरसमज

शार्दूलसिंह जपानी सैन्याबरोबर ब्रह्मदेशात भटकत असता ब्रिटिश सैन्याची एक तुकडी समोर आली.  रात्रीच्या वेळी मगरांचे भय न बाळगता शार्दुलसिंह नदी ओलांडून परत ब्रिटिश फौजेत दाखल झाला.  त्याने आपल्याला कैद करणार्‍या तुकडीची संपूर्ण माहिती देताच इंग्रज फौजेने रात्रीच्याच वेळी जपानी तुकडीवर हल्ला करून जय मिळविला.  शार्दूलसिंहाच्या ह्या धाडशी कृत्याबद्दल त्याला बढती मिळून ’कर्नल’ हुद्दा बहाल करण्यात आला.  युद्ध संपल्यावर तो हिंदुस्थानात परत आला.  बलवंतसिंहाला दिलेल्या वचनाची त्याला आठवण होती; परंतु त्याचा पत्ता शोध करूनही त्याला मिळाला नाही.

माईजी अंधार पडल्यावर धान्य आणण्यासाठी वाण्याच्या दुकानात गेल्या.  तेथेही त्यांची बाकी थकलेली होती.  त्यामुळे त्यांस काहीच मिळाले नाही.  दुबळ्या मुलाला खायला काय घालू याची त्यांना चिंता पडली.  रात्री जेमतेम मूठभर कणकीची रोटी भाजून त्यांनी मुलाला दिली आणि आपल्याला बुधवारचा उपवास आहे अशी थाप मारून थंडा फराळ करून त्या खाटेवर पडल्या.  उपाशी पोटी झोप कशी येणार?

’बेटा, शार्दूलभाई तुझा दोस्त आहे असं तू म्हणत होतास.  तो मेजर की कर्नल झालेला आहे असं मी ऐकलं.  त्याच्याकडून का नाही तू मदत मिळवीत?  तो कुठे आहे त्याचा पत्ता काढ अन् त्याला जाऊन भेट.’  माईजींनी उपदेश केला.

’माईजी, सारख्या दर्जाच्या माणसांतच दोस्ती राहू शकते.  त्याला जर आणाशपथांची आठवण राहिली असती तर एव्हाना त्यानं माझा पत्ता काढला नसता का?’  बलवंतसिंह म्हणाला.

’तो तुझा शोध करीतही असेल.  तू इथे ह्या भिकारी गावात कंगाल बिर्‍हाडात राहतो आहेस.  तुझा पत्ता शोध करणाराला तरी कसा लागेल?  तूच त्याचा शोध काढ.  सुदामा कृष्णाजीचा शोध करीत द्वारकेला गेला होता; कृष्णाजी नाही आले आपल्या दरिद्री भक्त्ताचा पत्ता काढीत!’

दुसर्‍या दिवशी बलवंतसिंहाला त्याचा एक नातेवाईक येऊन भेटला.  त्याच्या हातात एक वर्तमानपत्राचा ताजा अंक होता.  त्यात खालील बातमी होती.
’रविवारी सायंकाळी ठीक सहा वाजता कर्नल शार्दूलसिंह यांच्या हस्ते पोलिस फुटबॊल टीमला बक्षिसे वाटण्याचा समारंभ पोलिस ग्राउंडवर होणार आहे.’
बातमी वाचताच आनंदाने तो उद्गारला, ’माईजी, शार्दूलसिंहाचा पत्ता लागला!  रविवारी लाहोरास पोलिस ग्राउंडवर त्याच्या हातून बक्षीस समारंभ व्हायचा आहे.  ठीक ठीक, मी तिथेच जाऊन त्यांना भेटतो.’

रविवारी बक्षीस समारंभाच्या जागी शार्दूलसिंह खुर्चीवर येऊन बसला होता.  समारंभास पंधरा मिनिटे अवकाश होता.  बलवंतसिंहाला त्याच्या नातेवाईकांनी धरून पोलिस ग्राउंडवर नेले होते.  शार्दूलसिंहाला पाहताच त्याला प्रेमाचे भरते आले.  धडका हात पुढे करून तसाच लंगडत तो शार्दूलसिंहापुढे जाऊन उभा राहिला.  आपला हात तो घट्ट धरून तो प्रेमाने हालवील असे बलवंतसिंहास वाटले होते; परंतु हस्तांदोलन करण्याचे राहोच, त्याने बलवंतसिंहाकडून दुसरीकडे तोंड वळविले आणि शेजार्‍याशी काही बोलणे केले.  पुन्हा एकदा बलवंतसिंहाकडे त्याने तोंड केले, पण ओळखही दिली नाही.  हे पाहताच बलवंतसिंह माघारी फिरला.  त्याच्या हृदयावर मोठाच आघात झाला.  त्याच रात्री हातातील क्रुपाणानें त्याने स्वत:चा प्राणनाश करून घेतला!

बक्षीस समारंभाला प्रारंभ करताना पोलिस कमिशनर म्हणाले, ’मित्र हो, कर्नल सरदार शार्दूलसिंह ह्यांच्यासारख्या बहाद्दरांच्या हातून बक्षीस घेताना तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे.  कर्नलसाहेब जपानात लढत असताना ऎटम बॊम्बच्या हल्ल्यापासून जवळच पराक्रम गाजवीत होते.  आपल्या सहजी लक्षात येणार नाही पण ऎटम बॊम्बच्या परिणामानं त्यांचे दोन्ही डोळे पूर्ण आंधळे झालेले आहेत आणि आंधळे झाल्यावरदेखील त्यांनी आपल्या सेनेला बहुमोल दिग्दर्शन केलेलं होतं.  सर्वांच्या वतीनं मी त्यांना बक्षिसं देण्याची विनंती करतो.’

Thursday, October 28, 2010

चिमणरावाचे चर्‍हाट (लेखक - चिं वि. जोशी)

जर्मन महायुद्धाच्या वेळी पुणे येथे सरकारने लष्करी खर्चाचे हिशेब ठेवण्यासाठी मोठी थोरली हंगामी ऒफिसे उघडली.  लढाईच्या महर्घतेने पांढरपेशा लोकांची जी दाणादाण उडाली, तीत पुण्याच्या वॊर ऒफिसांनी त्यांस चांगला हात दिला हे प्रसिद्ध आहे.  मॆट्रिक झालेल्या इसमाने समक्ष अर्ज करण्याचा अवकाश, की त्यास साठाची व बी. ए. स एकशेविसाची नोकरी हटकून ठेविलेलीच.  वशिल्याच्या तट्टास तर त्याच्या दुप्पट तनखा मिळत असे; परंतु असल्या प्राण्यांत गणना होण्याइतका भाग्यवान नसल्याने मला साठ रुपयांचाच प्रारंभ मिळाला.

निव्वळ मॆट्रिकवर इतके रूपये मिळत असल्याने छपन्न देशचे कारकून पुण्यास लोटलेले होते.  मद्रासचे एन् माडती आप्पा, पंजाबचे धिप्पाड दाढीवाले लाला, बंगालचे भुकेकंगाल बाबू इत्यादी लोक आपआपल्या देशातून येताना निसर्गदत्त लेण्यांशिवाय फारशी अधिक वस्त्रे न घेता येत.  कारण कापडाची महागाई इतकी भयंकर झाली होती, की त्या वेळी धोतरजोडीस जी किंमत पडत असे तिच्यात हल्ली इरकली लुगडे मिळू शकते.  परंतु हे बुभुक्षू लोक एक महिन्याचा पगार हाती पडताच नखशिखान्त साहेबी पोशाखात विराजमान होऊन व्हॆसेलिन, पोमेड, ब्रिलियन्टाइन वगैरे उपयुक्त जिनसांच्या किंमती आणखी वर  चढवीत असत.  मीही एक-दोन महिन्यांत अप-टु-डेड बनलो हे सांगावयास नकोच.  एक लहानसे बिर्‍हाड भाड्याने घेऊन त्यातील पुढच्या खोलीत टेबलखुर्च्यांचा थाट ठेविला आणि दारावर इंग्रजी अक्षरांत पाटी लाविली.  परंतु या माझ्या थाटाने दोन ब्यादी माझ्यामागे लागल्या.  एक उपवर मुलींचे बाप, व दुसरी विमा कंपन्यांचे एजंट म्हणजे दलाल.  या वर्षी मुलींच्या बापांस चकविण्यासाठी ज्या यातायाती मला कराव्या लागल्या त्यांचा अनुभव आमच्या पुरूषवाचकांपैकी जे विवाहित आहेत त्यांस पूर्वी आलाच असेल; व जे अविवाहित आहेत त्यांस येणार आहेच; म्हणून त्यांचे वर्णन करून स्मरणांचे दु:ख वाढविण्याच्या किंवा अपेक्षेचे सुख कमी करण्याच्या भरीस मी पडत नाही.

एका रविवारी दुपारी चार वाजता आई चहा करीत होती व मी त्याची वाट पाहात हातात एक कादंबरी घेऊन खुर्चीवर बसलो होतो.  रुपयाला एक शेर साखर व सव्वा रुपयाला एक पौंड चहाची भुकटी झाल्याने बहुतेक कुटुंबातून दुपारच्या चहाला छाटच मिळाला होता; तथापि आम्हा "वॊर हापिसवाल्यां" ना रुपयास तीन शेर साखर व बारा आणे पौंड चहा आमच्या रेशन्सबरोबर मिळे.  इतरांस ज्या सुखाचा उपभोग घेता येत नाही त्याचा उपभोग आपल्याला एकट्यालाच मिळताना सुख शतगुणित होते - आगगाडीत इतर उतारू स्थलसंकोचामुळे उभे राहणे, भांडणे करणे, चेंगरणे इत्यादी हाल अपेष्टा सोशीत असता वरच्या फळीवर स्वस्थ पडून त्यांची गंमत पाहात राहण्याचे स्वर्गसुख ज्यांनी भोगिले असेल अशा आमच्या वाचकांस माझ्या वरील सुभाषिताचे सत्य पटलेच असेल - म्हणून दुपारी चहा घेताना  मला फारच आनंद व अभिमान वाटे.

Sunday, October 24, 2010

बायपास (लेखक - रविंद्र गुर्जर)

पावणेसहा वाजता मी हॊटेलवर पोचलो.  सहा लाख रुपयांच्या नोकरीवर ’उदक’ सोडून मी परतलो होतो.  मला माझा अभिमान वाटत होता.
मायाला कधी एकदा भेटेन आणि माझी ’गौरवगाथा’ ऐकवीन, असं मला झालं होतं.
’माया!’ मी हाक मारली.  आमच्या खोलीचं दार उघडंच होतं.  ते ढकलून मी आत गेलो.
’माया’, मी पुन्हा आवाज दिला. पण उत्तर आलं नाही.
मी आत सगळीकडे पाहिलं.  माझा उत्साह केव्हाच ओसरला होता.  उलट आता धीर खचू लागला.  ती मला सोडून निघून तर गेली नसेल? छे! शक्यच नाही!
भिंतीशी असलेल्या टेबलावर एक घडी केलेला कागद दिसला.  धडधडत्या अंत:करणानं मी तो उचलला.  माझ्यासाठी तिनं काय निरोप ठेवला होता?
’प्रिय शाम,
कितीही सहनशील बाई इतका वेळच वाट बघू शकते.  (दुपारचे ४-३० झाले आहेत, समजलं?) नंतर ती खरेदीसाठी बाहेर पडते.  ७ च्या आत नक्की परत येणार.

तुझीच,
माया.
असह्य उकाड्याच्या दिवसात थंड हवेची झुळूक यावी, तसं मला झालं.  मी एक सुटकेचा श्वास टाकला.  चिठ्ठी टेबलावर खाली टाकून मी फोनजवळ गेलो.  ऒपरेटरला माझ्या ऒफिसचा नंबर दिला.
शर्माचा आवाज उत्सुकतेनं ओतप्रोत भरला होता.
’मुलाखत कशी काय झाली, साहेब?’
’फारशी चांगली नाही,’ मी उत्तर दिलं.  ’शेटजींना मी त्यांच्या कंपनीत नोकर म्हणून हवा आहे.  आपली जाहिरात मोहीम राहिली बाजूला.’
’त्यांची ऒफर काय आहे?’
’वर्षाला सहा लाख रूपये.  त्यांना म्हणे मी आवडलो आहे.’
शर्माची शीळ फोनशिवायही मला ऐकू आली असती.
’मग तुम्ही सुरूवात कधी करणार?’
’कधीच नाही’, मी म्हणालो.  ’त्यांना तसं सांगूनही टाकलं.’
’काय म्हणता?’ तो जवळजवळ ओरडलाच.  ’डोकं ठिकाणावर असलेला कोणीही तसं करणार नाही.’
’असं कर’, मी म्हणालो, ’येरवड्यात मेंटल हॊस्पिटलमध्ये माझ्यासाठी बुकिंग करून ठेव; कारण माझा नकार ठाम आहे.’
’पण सर,’ त्यानं कुरकूर केली.  ’अशा संधीची तुम्ही कित्येक वर्षं वाट बघत होता.  शिवाय इथला धंदा मी सांभाळू शकतो.  अर्थातच, तुमच्यातर्फे गुपचुप.’
त्याच्या आवाजाला महत्त्वाकांक्षेची धार होती.  आम्ही एकदम भागीदार बनत होतो.  ही गोष्ट मला आवडण्यासारखी नव्हती.
’मी सांगितलं ना, मला इंटरेस्ट नाही! अजूनतरी मी बॊस आहे. नव्या जाहिरात मोहिमेबद्दल मला अद्याप आशा आहे,’ मी म्हणालो.
’विनोदभाईंच्या मनाविरुद्ध जाणार असाल तर ते अकाऊंट विसरा.’  त्याचा आवाज पडलेला होता.
’ते मी बघून घेतो,’ मी म्हणालो.
’ओके बॊस! तुम्ही केव्हा परत येणार? मी घरी फोन करून काही कळवू?’
’नको.  मी करीन.  उद्या ऒफिसवर मी हजर आहे,’ मी सांगितलं.
’ठीक आहे,’ तो म्हणाला आणि आम्ही फोन बंद केला.  त्याची निराशा झालेली होती.  पुढचा फोन मी घरी लावला.  आशा ताबडतोब फोनवर हजर झाली.

Tuesday, October 12, 2010

चीनी माती (लेखिका - मीना प्रभू)

बंड वरून आम्ही चालत होतो ते ’पीस’ हॊटेलच्या दिशेनं. जुन्या जमान्यात सर्वाधिक गाजलेलं हे हॊटेल अजून उभं आहे. अजून सुप्रसिद्ध आहे. याचं पूर्वीचं नाव ’कॆथे हॊटेल’. व्हिक्टर ससून या प्रख्यात भारतीय ज्यूनं हे १९३० मध्ये बांधलं.

ससून कुटुंब मूळचं बगदादी ज्यू, पण अनेक पिढ्यांपूर्वी ते भारतात येऊन राहिलं. ब्रिटिशांना अफूच्या व्यापारात मदत करून अपरंपार श्रीमंत झालं. ब्रिटिश राजघराण्यानं व्हिक्टर ससूनला ’सर’ हा किताब दिला होता.

भारतीय स्वातंत्र्ययुद्ध जोरात पेटल्यावर सुरक्षिततेसाठी भारत सोडून तो शांघायला गेला. तिथं त्यानं आपली सारी धनदौलत जमीन-जुमल्यात आणि शर्यतीच्या घोड्यांत ओतली. या शहरात त्याच्या एकूण एकोणीसशे इमारती होत्या. त्यांचा मुकुटमणी ’ससून हाउस’ म्हणजेच त्याचं ’कॆथे होटेल’.

मुंबईला उतरावं तर ’ताज’ मधे, सिंगापूरला ’रॆफेल’ मधे, हॊंगकॊंगला ’पेनिन्सुला’ मधे, तसं शांघायला या ’कॆथे हॊटेल’ मधे असं उच्च वर्तूळात म्हटलं जायचं. त्याचा हिरव्या पिरॆमिडसारखा कळस कुठूनही दिसतो. सर्वात वरच्या बाराव्या मजल्यावर ससूनचं ऒफिस आणि पेंट हाउस होतं. तिथून तो आपल्या जंगी इस्टेटीची देखभाल करी.

हा धनत्तर ससून अतिशय हौशी आणि रंगेल गुलछबू होता. विमान अपघातात दोन्ही पाय निकामी झालेल्या या गृहस्थानं शांघाय गाजवलं. त्याच्या थाटामाटाच्या पार्ट्या, खाने, गाणी-बजावणी, भेटवस्तू, घोड्यांच्या शर्यती आणि लफडीकुलंगडी शांघायमध्ये सर्वांत अधिक चघळली जात. पार्टीला आलेल्या हजारभर पाहुण्यांना भेट म्हणून त्यानं एकदा सोन्याची घड्याळं दिली होती.

दौलतीची ही चढती कमान कम्युनिस्ट राजवट आल्यावर कोसळली. त्यांनी ससूनची सारी जायदाद हिसकावून घेतली. जिथं देशोदेशींचे राजदूत संचार करत असत त्या कॆथेमध्ये हजारो कम्युनिस्ट सैनिक गाडगी-मडकी, सरपण, भाजीपाला, कपड्यांची बोचकी खेचरावर लादून आले. बंदूक हाती दिलेले शेतमजूर ते. असलं वैभव कधी स्वप्नात न पाहिलेलं. त्यांनी घातलेला धुमाकूळ अजब होता. कुणी तास न् तास लिफ्टनं खाली-वर करत. कुणी छपरी पलंगावर उड्या मारत. कुणी संडासच्या कुंडीमध्ये तांदूळ धूत. कुणी आपली खेचरं आतल्या बारला बांधून टाकली. उंची गालिचा लिदीखाली सडला.

सरकारनं हिसकावून घेतलेलं हे हॊटेल १९५३ मधे ससूननं कागदोपत्री सरकारला बहाल केलं. अधिकार्‍यांकडून मोठ्या मिनतवारीनं देशाबाहेर जाण्याचा परवाना मिळवला आणि शांघायमधून पळ काढला. तो म्हणायचा, ’मी भारत सोडला पण चीननं मला सोडलं!’

पुण्याच्या ससून रूग्णालयात मेडिकल कॊलेजची पाच वर्षं काढलेली असल्यानं जुन्या आठवणींचे लोट आले. इतक्या दूरच्या ठिकाणी इतक्या जवळचं नाव असं आकस्मात भेटत होतं, त्याचा आनंद झाला. पण ज्या ससून कुटुंबानं दक्षिण महाराष्ट्रातल्या लाखो रूग्णांची सोय केली, त्याची दया दुसर्‍या एका देशाला व्यसनाच्या खाईत लोटून कमावलेल्या पैशावर बेतलेली होती, हे उमगून मन विषण्ण झालं. ’ठेव म्हणून ठेवलेल्या जमिनी विश्वस्तांनीच लाटून, त्यांच्यावर इंग्लिश बॆरिस्टरांच्या जगाला कायदा शिकवणार्‍या ’इन्स ऒफ द कोर्ट’ या संस्था पूर्ण बेकायदेशीरपणे उभारल्या’ हे सत्य समजल्यावर झालं होतं तसं.

पुढे अनेक वर्षांनी ’पीस हॊटेल’ या नावानं ससूनच्या कॆथे हॊटेलचं पुनरूज्जीवन झालं. पूर्वीसारखं सजवून ते पर्यटकांसाठी उघडलं गेलं. तिथं जाऊन कमीतकमी चहा तरी पिऊन यावं असा माझा मनोदय होता.

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना हॊटेल पसरलेलं. उजव्या हाताच्या इमारतीत मुख्य प्रवेशद्वार होतं. गेल्या शतकाच्या प्रारंभीच्या ’निओ-क्लासिकल’ शैलीतली सहा मजली देखणी इमारत. तिच्या दुधी आणि शेवाळी रंगसंगतींवर सोनेरी वेलबुट्टी झळकत होती. त्याच रंगांच्या गणवेषातल्या दरवानानं आदबीनं वाकून स्वागत केलं आणि आत पाचारण केलं.

आतली सजावट तशीच भारदस्त. किंचित अंधार्‍या स्वागत-कक्षात भरगच्च झुंबरं, जाड गालिचे, चमकतं जॊर्जिअन फर्निचर आणि जाड मखमली पडदे होते. हॊंगकॊंगमधल्या चायना-क्लबसारखं पुन्हा एखाद्या इंग्लिश-क्लबमधे शिरल्यासारखं वाटलं.

सुंदर कोरीव जिना. वरच्या मजल्यावर चहापानाची व्यवस्था होती. तिथं जाऊन जुन्या आरामखुर्च्यांमधे सैलावून बसलो. संत्र्याचा रस आणि इथली ’खासियत’ म्हणून सेवकानंच सुचवलेला क्लब सॆंडविच मागवला आणि सभोवती पाहायला लागलो.

नोएल कॊवर्ड गळपट्टा सावरीत आता तिकडून येईलसं वाटलं. येईल सुद्धा! ’प्रायव्हेट लाईफ’ हे त्याचं गाजलेलं नाटक इथंच लिहिलं गेलं होतं. आतल्या खोलीत, लेखकांच्या गराड्यात सॊमरसेत मॊम ’रेझर्स एज’ वाचून दाखवत असेल, की ग्रॆऎम ग्रीनचे खास मित्र त्याला नव्या रहस्यकथेचा प्लॊट सांगायचा आग्रह करत असतील?

पूर्वी सजावट, भोजन आणि मदनमस्त खेळ यांनी वेगळं वलय बहाल केलेलं हे आगळंवेगळं हॊटेल आज जुनाट, मंद आणि किंचित केविलवाणंच वाटत होतं. कर्जबाजारी वतनदारानं आपला पुरातन वाडा कसाबसा तगवून धरल्यासारखं. लठ्ठ चिरूट ओढणारे दोन अमेरिकन, त्यांच्या जाडजूड बायका आणि घसा खरवडत बोलणारे जर्मन. आम्ही वगळता कुतूहलानं जमलेली एवढीच पर्यटक मंडळी आता इथं हजर होती.

मागवलेला खास पदार्थही काही खास नव्हता. तेव्हा दोन ऒरेंज ज्यूसचे ३५० रूपये टिच्चून ’एवढ्या पैशात मुंबईला उडप्याकडे चार जण जेवलो असतो’ असं हळहळत बाहेर आलो. त्या भिकार क्लब-सॆंडविचचे पैसे देण्याचं मात्र आम्ही नाकारलं.

STAY हंग्री STAY फूलिश (लेखिका: रश्मी बन्सल अनुवाद: विदुला टोकेकर)

"आम्ही तीन निकष लावतो. ते तीनही एकाच प्रकल्पात पूर्ण करणं कठीण आहे; पण निदान दोन तरी पूर्ण होतील असं आम्ही बघतो. तर एखादा प्रकल्प एकच निकष पूर्ण करत असेल, तर त्यात तो एकदम सर्वोत्तम असला पाहिजे आणि त्या तीन मिती आहेत. [ त्यातून आम्हाला पैसा मिळाला पाहिजे किंवा त्यातून आम्हाला नाव, कीर्ती मिळाली पाहिजे किंवा त्यातून आम्हाला भरपूर आनंद मिळाला पाहिजे.]

जाई (लेखक :- सुहास शिरवळकर)

त्यावेळी समस्त विद्यार्थिनी वर्गाकडे पाहाण्याचा माझा दृष्टीकोण ’बहीण’ या सदरात असायचा. त्या मागचं खरं कारण कोणालाच माहीत नसल्यामुळे माझी ’सपक भाऊराया’ म्हणून फार टिंगल व्हायची.
मी देखणा होतो-आहे-असं म्हंटलं तर आत्मस्तुती होईल; पण ती वस्तुस्थिती आहे. नाव घेत नाही, पण आजही माझे कित्येक सहकारी वकील मला आपल्या घरी न्यायला कचरतात! पंधरा-पंधरा, वीस वीस वर्ष संसार केल्यानंतरही आपल्या पत्नीचा त्यांना माझ्या संदर्भात विश्वास देता येत नाही!
तर, रूपाचं एक बाजूला ठेवू. पण अभ्यासेतर चळवळीतही मी नेहमी अभ्यासाइतकाच अग्रेसर होतो. त्यामुळे, मुलांना हेवा वाटावा इतक्या मुलींशी माझे संबंध आले. (विशेष म्हणजे, आजही एखादा अपवाद वगळला तर या मुली (?) रस्त्यात थांबून माझ्याशी बोलतात. नवर्‍याशी चक्क माझी ओळख करून देतात (!) या पैकी कितीतरी जणींनी माझ्या प्राप्तीकरिता प्रयत्न केले असतील, पण मी कोणालाच वश झालो नाही. (आज त्याचा मला फार पश्चाताप होतो!))
दीपा कोल्हटकर, आशा तळवलकर, रजनी मरकळे, नेत्रा कुलकर्णी, सुधा नेने.... नावं आठवायची म्हंटली, नि त्यांची ’प्रेम केलेल्या’, ’अव्यक्तपणे, पण प्रेम करणार्‍या’, ’प्रेमात पडल्या असाव्यात असा संशय असलेल्या’ - अशी वर्गवारी केली तरी पहिल्या प्रकारात तेरा मुली मला आठवतायत. दुसर्‍या प्रकारात असंख्य होत्या, नि तिसर्‍यात दोन-तीन! त्यांची एव्हाना सर्वांची नावं बदललेली आहेत, म्हणून मी निर्धास्तपणे नावं सांगितली.
एक जाई सोडली तर यातल्या कोणालाही मी ’माझी’ म्हणायला तयार नव्हतो. अन् जाई ’पद्माकर’ ची होती!

** ** **

पण आता खरं कबुल करायला हरकत नाही. कॊलेजच्या वातावरणात रंगल्यानंतर जाईच्या आठवणींनी मला ईतका त्रास दिला नाही. तिला वगळता काहीच उरत नाही, ही माझी समजूत अगदी भ्रामक ठरली. याचा अर्थ, मी जाईशी बेईमान होऊन कुणा मुलीच्या प्रेमात वगैरे पडलो असा नाही. पण मुलींकडे पाहण्याच्या माझ्या दृष्टीकोनात नंतर-नंतर खूपच बदल झाला. वागण्यातही फरक पडला. कॊलेज-लाईफ़ त्यामुळे उपभोगता आलं. मनाला अपराधाची टोचणी अशी लागली नाही केव्हाच.


त्या काळात दीपा कोल्हटकर हे नाव माझ्या जोडीनं घेतलं जायचं. तिचा चेहरा कंपासानं वर्तुळ काढल्यासारखा गोल होता. गाल गुब्रे-गुब्रे होते. नाक थोडं अपरं आणि नकटं होतं. डोळे मात्र मांजरीसारखे घारे आणि टप्पोरे होते. एकदम गोड दिसायची पोरगी. तिच्या गुलाबी रंगाला तिचे तपकिरी छटा असलेले कुरळे केस फार शोभून दिसायचे. माझ्या मनात जाई नसती तर या मुलीच्या मी केव्हाच प्रेमात पडलो असतो. इव्हन, तिनं त्या बाबतीत धीटपणे पुढाकारही घेतला होता.

महाडच्या स्पर्धेसाठी जी नावं आली होती, त्यात ’दीपा कोल्हटकर पी.डी.’ हे एक नाव होतं. नावावरून, किंवा आवाजावरून, किंवा पाठमोर्‍या आकृतीबंधावरून मुलीच्या रूपाची कधीही कल्पना करायची नसते हे एव्हाना मला कळायला लागलं होतं. माझ्या एका मित्राच्या बोलण्यात, त्याच्या शेजारी राहणार्‍या एका मुलीचा फार वेळ उल्लेख यायचा. बरं तिचं नाव पण आई-बापानं अगदी शोधून काढलं होतं. सुवर्णा. का कोणास ठाऊक, ही सुवर्णा म्हंटलं की वैजयंतीमाला अगदी गॊगल्ससह माझ्या डोळ्यांसमोर साकार व्हायची. म्हणून म्हंटलं - चल दाखव तरी तुझी सुवर्णा! तर.... अगग! रेल्वेच्या इंजिनाची भट्टी आणि कोळशाच्या समागमातूनच तिचा जन्म झाला असणार!
होतं असं बर्‍याचदा, मागून तंबोर्‍यासारखी भरीव वाटणारी पोरगी आवर्जून पुढे जाऊन, मान वळवून पाहावी, तर हमखास तिच्या डोळ्यांच्या जागी कोटांची बटणं तरी दिसतात, किंवा कोणी तरी खालून बोट लावून वर केल्यासारख्या तिच्या नाकपुड्या तरी वर उचललेल्या असतात, नाही तर तिचे दात भलतेच जागरूकपणे पुढे येऊन तिच्या ओठांचं संरक्षण करीत असतात.
म्हणूनच, ’दीपा कोल्हटकर’ या नावाकडून माझ्या कसल्याही अपेक्षा नव्हत्या.

निमित्तमात्र (लेखक :- सुहास शिरवळकर)

"बुधवारी रात्री आम्ही चार-पाचजण माझ्या रूमवर जमणार आहोत. मी मिलीटरी कोट्यातली रम मिळवलीय. विप्लवा म्हणून माझी एक मैत्रीण आहे, ती हैद्राबादी पद्धतीचं नॊनव्हेज करणार आहे. तू पण येशील ना?"
"नेकी, और पूछ-पूछ?"
"वा! म्हणजे, तू नॊनव्हेज खातोस!"
"माणूस सोडून काहीही!"
"आणि हे?"
"मूत सोडून काहीही!"
माझ्या पाठीवर पसंतीची थाप मारीत, तो खुश होऊन हसला.

माझा अल्बम (लेखक :- कै. प्रवीण महाजन)

कपिल व वृषाली यांना बारावीला त्यांच्या आयुष्यातील सर्वात जास्त गुण मिळाले. त्यांच्या अकरावीचा निकाल लागण्यापूर्वी मी जेलमध्ये आलो. संपूर्ण वर्ष तणावाचा सामना करीत सारंगीने व तिच्या आई अन् दिन भावांनी त्यांना सांभाळून घेतले. त्यांच्या या यशाचे श्रेय त्यांनाच आहे. बहुतांश सर्व वृत्तपत्रात मुलांचे कौतुक झाले. ते वाचून जेलमध्ये पण कैद्यांनी माझे अभिनंदन केले. डोळ्यातील पाणी लपविता लपविता माझी घालमेल झाली.
संकट हे आयुष्याला वळण लावते. बर्‍याचवेळी संधी संकटाच्या रूपाने उभी असते. ही गोष्ट माझ्या दोन मुलांनी जर ओळखली तर त्यांना पुढील आयुष्यात जिद्दीने उभे राहता येईल, असा माझा ठाम विश्वास आहे. न्यायालयात मुलांना आणू नका त्यांच्या मनावर परिणाम होईल, असे मला बर्‍याच लोकांनी सांगितले. अगदी पोलिस व सरकारी वकिलांनी सुद्धा... पण मी निर्णय त्या दोघांवरच सोडला. माझं जेलमध्ये अनिश्चित काळासाठी असणं ही माझ्या दोन मुलांना संकटाच्या रूपात संधी आव्हानच देत आहे. आम्हा तीन भावांच्या सर्व मिळून सहा मुलांमध्ये फक्त कपिल व वृषाली दहावी व बारावीला प्रथम श्रेणीत पास झाले. बाकी चारजण बारावीपर्यंत पोहोचू पण शकले नाहीत. प्रमोद नेहेमी मला ’शराबी’ या चित्रपटातील आमिताभचे वाक्य सांगत असे
पुत सुपुत तो क्यू धनसंचय?
पुत कुपुत तो क्यू धनसंचय?
प्रमोद कधीही चांगला बाप बनू शकला काय? कारण राजकीय यशाने त्याला आर्थिक सुबत्ता आणली. तात्काळ त्याने पुन्हा ते तारूण्य, जे काकांच्या जाण्याने कौटुंबिक जबाबदारीत गेले होते, ते पुनश्च जगण्याचा त्याने चंगच बांधला होता. पण सत्तेपुढे शहाणपण नको, असे घरातील सर्वांनीच स्वीकारले असावे.

राहुल - कपिल आणि पूनम - वृषाली

दि. ३०-०४-२००६ च्या टाईम्स ऒफ इंडिया मध्ये पान क्रमांक दोन वर राहुल व कपिल या चुलत भावांचे दोन फोटो छापले होते. त्याचे शीर्षक होते In the name of the father. दोघेजण वेगवेगळ्या ठिकाणी आपआपल्या पित्यासाठी मंदिरात प्रार्थना करून बाहेर पडत असताना हे फोटो काढण्यात आले होते.
राहुल व कपिल यांच्या वयात साडेचौदा वर्षाचे अंतर आहे. दोघेही एकाच दिवशी (२२-०४-२००६) महासंकटात सापडले होते. राहुलचे वडील हिंदुजामध्ये मृत्युशी झूंज देत होते, कपिल तर या वयातही नाही की पुढे त्याच्या वडिलांचे काय होईल, हे समजण्याएवढा.
प्रमोदच्या निधनानंतर महिनाभराच्या आत राहुल ड्रग्ज सेवनाच्या दुसर्‍या संकटात सापडला. पुढील दोन आठवडे प्रसारमाध्यमात त्याच्याविषयी नाही नाही ते लिहून आले. विवेकच्या मृत्यूविषयीही त्याला जबाबदार धरण्यात आले. नंतर त्याचा विवाह व दुर्दैवाचा अखंड प्रवास.
खरे तर मी राहुलला त्याच्या आयुष्याच्या पहिल्या दिवसापासून पाहिले आहे. शैक्षणिक अपयश जर सोडले तर या मुलात आक्षेपार्ह असे काहीही नाही. त्याने कधी कुणाचा अपमान केला नाही, तर कुणाविषयीही अपशब्द कढले नाहीत. प्रमोदच्या चारित्र्यहीन वागणुकीचे विष त्याने न बोलता पचविले. पण त्यात त्याचे शैक्षणिक व मानसिक असे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे. माझ्याविषयी त्याने कधीही अपशब्द काढले नाहीत कारण त्याला सत्य माहीत आहे. कपिल अचानक उद्भवलेल्या संकटाला सामोरे जाण्याच्या वयातही नाहीये. पण, बारावीला त्याने त्याच्या आयुष्यातील सर्वात जास्त मार्क्स मिळवून मला दिलासा दिलाय.
पूनमच्या स्वभावाविषयी काय बोलावे? वृषालीने पूनमचा स्वभाव घेऊ नये असेच मी म्हणेन.

प्राक्तनाचे संदर्भ (कवि :- द. भा. धामणस्कर)

हस्तांतर

विसर्जनासाठी गणपती नेताना
मला मूर्ती अवजड झाली, तेव्हा
उसळत्या तारूण्याचा
माझा मुलगाच मला म्हणाला : द्या इकडे.

मी मूर्ती तात्काळ मुलाच्या हातावर टेकली
चौरंगासहित.
मुलानेही मूर्ती हातात घेतली नीट सावरून, तर
मी एका दैवी आनंदात अकल्पित
परंपरा पुढे सरकल्याच्या....

मी पुन्हा तरूण ययातीसारखा;
माझा मुलगा जख्ख म्हातारा,
परंपरेच्या ओझ्याने वाकलेला....

फुले आणि ते

१.
एक रहस्य सांगावे म्हणून
फुले पाकळ्या उघडतात, तेव्हा
समस्त आस्तिक तिथेच पोहोचलेले असतात
फुलांच्या परड्या घेऊन.

२.
त्यांना एक फूलही
निर्मिता यायचे नाही तुझ्यासारखे
म्हणून तर ते तत्परतेने
उमललेली फुलेच नाहीशी करतात.

३.
फुलता येत नाही म्हणून
फुले तोडणारे लोकच
उडता येत नाही म्हणून
पाखरांना पिंजर्‍यात ठेवतात....

के फाईव्ह (लेखक अनंत सामंत)

परत एकदा ड्रायव्हरला आठवण करून देत हे म्हणालेही, "काय रे, चोरबाजाराकडे नाही ना घेत आहेस गाडी?"
"नाही साहेब", ड्रायव्हरने हसत उत्तर दिलं, "लक्षात आहे माझ्या. पण साहेब, त्या एकाच बाजाराला मुंबईत चोर बाजार का म्हणतात माहीत आहे तुम्हाला?"
पाठल्या सीटवरून आरशात ड्रायव्हरकडे पाहत यांनी विचारलं, "नाही बुवा. तुला माहीत आहे?"
"छे!" ड्रायव्हर उत्तरला, "पण साहेब ज्या बाजारात चोर नसतात असा एकही बाजार या मुंबईत असेल यावर माझा विश्वास नाही; झाडून सारे चोर बाजार आहेत!"

हिरवी नजर (लेखक :- सुहास शिरवळकर)

"ही फार जुनी ट्रीक आहे. एखाद्याचं लक्ष इतक्या ठिकाणी विभागायचं, की मूळ मुद्दा तो विसरलाच पाहिजे!
गंमत बघा हं. एका माणसानं एका चोराला घरात लपवून ठेवलं. थोड्या वेळानं पाठलाग करणारे पोलीस तिथं पोहोचले. "
"ए, इकडून कोणाला जाताना पाहिलंस?"
"कोणाला म्हणजे?"
"चोराला."
"चोराला काय?"
"जाताना..."
"जाता ना? जा!"
"जा काय?"
"नको जाऊ!...तुला जाऊ आहे का?"
"ए! पुरूषाला जाऊ असते का?"
"जाऊला पुरूष!... पुरुषाला पुरूष!"
"का नाही? जाऊला पुरूष नसतो का?"