Thursday, March 29, 2018

एक होता कार्व्हर

'मी येत आहे!' 

१८९६ साल उजाडलं होतं.  डॉ.  बुकर टी. वॉशिंग्टन आपल्या कार्यालयात हताश होऊन बसले होते.  त्यांनी या भागातील आपल्या बांधवांना जमीन कसायला, दुभती जनावरं पोसायला, जोड-धंदे सुरु करायला, मुलाबाळांना शाळेत धाडायला उद्युक्त केलं होतं.  पण या अ‍ॅलाबॅमाची जमीनच इतकी निकृष्ट की कसलं पीक म्हणून निघतच नव्हतं.  चार्‍याअभावी दुभत्या जनावरांची जोपासना व पैदास योग्य प्रकारे होत नव्हती.  आणि हे असं असताना अर्धपोटी मुलांनी शाळेत यायचं कशाच्या जोरावर? यक्षप्रश्न होता. 

या प्रश्नाची उकल करण्यासाठी, विनाशाच्या गर्तेकडे वेगाने खेचल्या जाणार्‍या अ‍ॅलाबॅमाला वाचवण्यासाठी, भुकेच्या खाईत सापडलेल्या आपल्या दलित बांधवांना वर खेचण्यासाठी, शास्त्रशुद्ध पद्धतीने ही परिस्थिती हाताळू शकणारा एखादा समर्थ मदतनीस डॉ. वॉशिंग्टन यांना हवा होता.  वेळीच उपाययोजना झाली नाही तर तिथले लोक, तिथले धान्य, तिथली जमीन इत्यादी सारं नष्टप्राय होणार होतं.  यातच भर म्हणून की काय, अवेळी पडलेल्या मुसळधार पावसाने शेतांत फुललेल्या कपाशीच्या बोंडांचा लगदा केला होता.  संकटं कशी झुंडीने चालून आली होती.  सारीकडून पाश आवळत आणत होती.  

डॉ. वॉशिंग्टन विचार करत होते.  एकाएकी त्यांना आठवलं.  त्यांच्या 'आयोवा'तील एका भाषणाच्या वेळी त्यांचं अभिनंदन करताना एका श्रोत्याने त्यांना म्हंटलं होतं,
"आणखी एका सुशिक्षित, मुक्त मानवाशी हस्तांदोलन करताना मला आनंद होत आहे."
"आम्ही आमच्यापरीने प्रयत्न करत आहोत, एवढं खरं!" डॉ. वॉशिंग्टन विनयाने उत्तरले.
"सगळेच तुमच्यासारखे नाहीत.  तुमच्या तोडीचा फक्त एकच - जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर!"
"आँ, मी हे नाव कसं ऐकलं नाही?"
"तो एक निग्रो तरुण आहे! आयोवा स्टेट कॉलेजमध्ये Agricultural and Bacterial Botany चा तज्ज्ञ म्हणून अध्यापन करतो."  त्या श्रोत्याने माहिती पुरवली.
"एक निग्रो कृषि-तज्ज्ञ! आयोवा स्टेट कॉलेजात अध्यापक?"
"हो! आणि काय सांगू, तो लाकडाच्या तक्तपोशीवरसुद्धा धान्य रुजवून दाखवतो."

आता डॉ. वॉशिंग्टन त्या कृषि-ज्ज्ञ जॉर्जच्याबद्दल विचार करत होते.  त्यांना मनोमन खात्री वाटत होती की हाच कार्व्हर काहीतरी उपाय योजू शकेल.  पण त्याला इकडे आणावं कसं? तो होता उत्तर अमेरिकेच्या समृद्ध जीवनात वावरणारा उच्चविद्याविभूषित प्राध्यापक.  मानमरातब मिळवून भरपूर वेतनावर काम करणारा!  अशा व्यक्तीला या सदैव अडचणीत असणार्‍या संस्थेत बोलावणं, मदतीसाठी हाक देणं त्यांना प्रशस्त वाटत नव्हतं.  डॉ. वॉशिंग्टन पुनःपुन्हा विचार करत होते.  पण आता या अ‍ॅलाबॅमाच्या मातीतून केवळ विटांखेरीज काहीही पैदा करु शकत नाही, असं दिसल्यावर त्यांनी धाडस करुन 'जॉर्ज कार्व्हर'ला पत्र पाठवलं.  पत्रात त्यांनी अ‍ॅलाबॅमाची सारी कहाणी वर्णिली, आपली स्वप्नं प्रत्यक्ष उतरवताना उभ्या ठाकलेल्या अडचणी विशद केल्या.  आपल्या प्रयत्नांना पडत असलेल्या मर्यादा, वाढत्या गरजा या सार्‍यांची कल्पना दिली.  शेवटी लिहिलं - 

'मी तुम्हांला पैशाचं, उच्च पदाचं वा कीर्तीचं आमिष दाखवू शकत नाही.  पहिल्या दोन गोष्टी तुम्ही उपभोगत आहात, शेवटची तुम्ही कुठेही मिळवू शकाल, यात शंका नाही.  मी तुम्हांला या गोष्टी सोडायला सांगत आहे; त्यांच्याकडे पाठ फिरवायला विनवत आहे.  त्याच्या बदल्यात मी तुमच्यावर काम, अविरत कष्ट आणि शतकानुशतकं दारिद्र्याने गांजलेल्या, गुलामीच्या चिखलात रुतलेल्या दलितांना उद्धरुन त्यांना 'सुजाण मानव' बनविण्याची कामगिरी सोपवत आहे.'


चार दिवसांनी हे पत्र जॉर्जच्या हाती पडलं.  त्या पत्राच्या शिक्क्यावरून त्याने ताडलं, की हे फार दुरून, अगदी अमेरिकेच्या दक्षिण टोकाकडून आलेलं आहे.  त्याने अधीरतेने पत्र उघडून वाचायला सुरुवात केली.  एका दमात ते वाचलं.  नंतर प्रयोगशाळेतील आपलं काम आवरून तो बाहेर पडला.  'एम्स्'च्या वेशीबाहेरच्या आपल्या नेहमीच्या एकांतस्थळी पोहोचला.  खिशातून ते पत्र काढून शांतपणे पुन्हा एकदा वाचलं.  वाचून झाल्यावर क्षण, दोन क्षण विचार केला.  खिशातून छोटीशी डायरी काढून तिचं एक कोरं पान अलग केलं.  त्या पानावर तीनच शब्द खरडले - 'मी येत आहे!'  खाली सही. बस इतकंच.  तारीख नाही, वार नाही, प्रश्न नाही, शंका नाही.

त्याचं मन कसल्याशा आवेगाने भरून आलं होतं.  त्याच वेळी एक अनामिक मनःशांती त्याला जाणवत होती.  तो तसाच पोस्ट ऑफिसात गेला.  पोस्टाच्या पाकिटावर डॉ. वॉशिंग्टन यांचा पत्ता लिहून ते चिठोरं त्या पाकिटात सरकवलं.  पाकीट चिकटवलं आणि पोस्टाच्या पेटीत टाकून दिलं.  शांत मनाने जॉर्ज परतला, प्रयोगशाळेत गेला आणि आपल्या नेहमीच्या कामाला जुंपला.
M.S.  पदवी मिळाल्यानंतर आयुष्यात कधी नव्हे एवढा आनंद त्याला झाला होता.  पण या आनंदाला कुठे तरी बोच होती.  निखळ समाधान नव्हतं.
तळ-दक्षिणेत त्याचे लाखो बांधव भुके-कंगाल अवस्थेत होते.  ज्ञानप्रकाशात यायला धडपडत होते.  जॉर्ज त्यांचाच होता.  त्याला त्याचं ज्ञान बांधवांच्या उत्कर्षासाठी वापरायचं होतं, मारियाआत्याने घालून दिलेली आण पुरी करायची होती.
परमेश्वराने त्याच्यासाठी कामाची आखणी करून ठेवली होती - देवाच्या मार्गदर्शनाखाली ते पुरं करायला हवं होतं.
डॉ. वॉशिंग्टन यांच्या महान कार्याची माहिती त्याला होतीच.  त्यांची अनेक भाषणं वृत्तपत्रांतून वाचायला मिळाली होती.  'वांशिक समस्ये'वर त्यांच्याकडे तोडगा आहे, ह्याचं समाधान जॉर्जला वाटत होतं.  आता तोही त्यांच्या कार्यात सहभागी व्हायला निघणार होता.

पुष्कळ आठवडे त्याने या पत्राबाबतीत मौन पाळलं.  पण मनाचा निश्चय केल्याप्रमाणे तो वागत होता.  आपल्या अवचित जाण्याने कॉलेजच्या कामाचा विचका होऊ नये म्हणून त्याने प्रथम जोखमीची कामं पार पाडली.  आपल्या पश्चातही प्रयोगशाळेतील संशोधन-कार्यात खंद पडू नये; आपल्यावाचून काही अडू नये म्हणून आपल्या मदतनिसांना कामं समजावून दिली.  कामांचा आराखडा आखून दिला.  सारं काही नीट मार्गी लागलं आहे, आपल्या जाण्याने काही अडणार नाही याची खातरजमा करून जॉर्ज प्रा. विल्सन यांना भेटायला गेला.  त्यांच्यासमोर डॉ. वॉशिंग्टन यांचं पत्र ठेवलं.  त्यांनी ते वाचलं.  जॉर्जने त्यांना काय उत्तर धाडलं आहे हे प्रा. विल्सन यांनी वाचलं नसतानाही त्या उत्तराची कल्पना ते करू शकले.  प्रा. विल्सन गंभीर झाले.  जॉर्जने न सांगताच त्याचा निर्णय त्यांच्या ध्यानात आला होता.  त्यांच्या गंभीर मुद्रेचा अर्थ लक्षात घेऊन जॉर्ज म्हणाला,
"मी येतो असं लिहून टाकलं."
"जॉर्ज, हे अटळच होतं.  कधी ना कधी घडणारच होतं,"  विलक्षण उदास सुरात प्रा. विल्सन बोलत होते. "ते आज घडतंय इतकंच.  आम्ही पूर्णपणे जाणून होतो, की तुला फार दिवस आम्ही इथे अडकवून ठेवू शकणार नाही."
"माझ्यामागे संशोधन व प्रयोगशाळा यांच्या कार्यात खंड पडू नये म्हणून मी सारी व्यवस्था लावून दिली आहे.  मदतनीसही तरबेज झाला आहे.  मला वाटतं, माझ्या जाण्याने फारसं अडणार नाही."
"ते सारं खरं आहे.  मलाही मान्य आहे.  पण जॉर्ज, तुझी जागा कोण घेऊ शकेल?"
नंतर ते दोघे मिळून संस्थेच्या अध्यक्षांकडे  गेले.  त्यांनीही डॉ. वॉशिंग्टन यांचं पत्र वाचलं.  सारं काही समजून चुकल्याप्रमाणे ते म्हणाले,
"उदात्त ध्येयाकडे पाठ फिरवणं म्हणजे करंटेपणा आहे, मूढता आहे.  ते तुला मानमरातब सोडायला विनवत आहेत;  पण त्याच्या बदल्यात चिरंतन शाश्वत मूल्यं जोपासण्याची सुसंधी देत आहेत.  आता नाकर्तेपणा नको."  त्यांनी जॉर्जचा हात हाती घेतला आणि भरल्या डोळ्यांनी, रुद्ध कंठाने म्हणाले,  "जॉर्ज, तुला आठवत असेल,. यापूर्वीही तुला एका कॉलेजने कृषि-विभागात नोकरी देऊ केली होती.  त्या वेळी प्रा. विल्सन यांनी काय उत्तर दिलं होतं?...
आम्हाला जॉर्ज असा हातचा घालवायचा नाही.  त्याची जागा घ्यावी असा दुसरा कोणी आमच्या हाताशी नाही.  जॉर्जसारख्या विद्यार्थ्याची किंमत आम्ही जाणून आहोत.  हे शब्द कदाचित कौतुकाचे वाटतील; पण जॉर्ज त्या कौतुकाला पात्र आहे, हे नि:संशय!!"
"पण  यावेळी आम्ही तुला अडवून ठेवू शकत नाही.  तुझ्या जीवितकार्याची जाणीव आम्हाला आहे.  संकुचित विश्वात तुला अडकवून, जखडून ठेवण्याचं पाप आम्ही करणार नाही.  जा, देव तुझा पाठीराखा आहे.  शुभस्य शीघ्रम्!"

कॉलेजतर्फे त्याला निरोप देण्यात आला.  या निरोपसमारंभात प्रा. विल्सननी विद्यार्थ्यांच्या वतीने त्याला एक उत्तम प्रतीचा मायक्रोस्कोप भेट दिला.
उत्तरादाखल बोलताना जॉर्ज गहिवरला.  तो म्हणाला,
"आज मी जो काही आहे, तो या कॉलेजमुळे!  त्यासाठी आणि या सुंदर, अपूर्व भेटीसाठी मी तुमचा शतशः ऋणी आहे."
हुशार आणि तल्लख जॉर्जला M.S. नंतर Ph.D. मिळवणं कठीण नव्हतं.  पण डॉ. वॉशिंग्टन यांचं पत्र हातात पडताच वैयक्तिक विकासाचा मार्ग सोडून जॉर्ज आपल्या बांधवांची सेवा करायला 'टस्कीगी'ला निघाला.

'टस्कीगी नॉर्मल अ‍ॅन्ड इंडस्ट्रियल स्कूल फॉर निग्रोज्' या संस्थेत 'डायरेक्टर अ‍ॅन्ड इन्स्ट्रक्टर इन सायंटिफिक अ‍ॅग्रिकल्चर अ‍ॅन्ड डेअरी सायन्स' या पदावर त्याची नेमणूक झाली होती.  पगार होता वार्षिक १५०० डॉलर्स.

*****
मी भूमिपुत्र!

टस्कीगी संस्थेच्या बँकेत दोन वर्षं काम केलेल्या अर्ल विल्सन यांचा डॉ. कार्व्हर यांच्या आर्थिक व्यवहाराबद्दलचा अनुभव खासच आहे.  १९२३ सालची गोष्ट.  त्या वेळी श्री. विल्सन नुकतेच रुजू झाले होते.
संध्याकाळची वेळ.  बँकेचं कार्यालय बंद होण्याचा सुमार.  बँकेच्या प्रतीक्षागृहात प्रा. कार्व्हर शांतपणे शांतपणे येऊन बसले.  श्री. विल्सन घाईने त्यांच्यापाशी गेले
"मला चेक हवा होता -" अपराधी स्वरात प्रा. कार्व्हर म्हणाले.  श्री. विल्सन घोटाळ्यात पडले.  पगाराचे चेक्स एक मे रोजी निघणार होते, आणि आज तर एप्रिलची तेवीस तारीख!  इतक्या आधीच त्यांना पगाराचा चेक द्यायचा म्हणजे जरा...!
"माफ करा प्रा. कार्व्हर! अजून पगाराचे चेक्स तयार व्हायचे आहेत."
"मुला, तू नवखा दिसतोस.  जरा दुसर्‍या कोणाला तरी बोलाव बरं!"
तितक्यात बँकेचा दुसरा एक कारकून बाहेर आला.  प्रा. कार्व्हरना प्रतीक्षागृहात पाहताच म्हणाला - 
"थांबा हं डॉक्टर एक मिनिट, आत्ता आणतो तुमचा चेक."

श्री. विल्सन जरा नाराजीनेच आपल्या जागेवर गेले.  त्या जुन्या-जाणत्या कारकुनाने तिजोरीचा एक खण उघडून भराभर रिकामा केला, तळाचा चेक काढला, बाकीचे चेक्स पुन्हा क्रमवार लावून ठेवले.  वेगळा काढलेला चेक डॉ. कार्व्हरांच्या हवाली केला.  त्याचे आभार मानत डॉ. कार्व्हरनी तो चेक खिशात सरकवला आणि ते बँकेच्या बाहेर पडले.
श्री. विल्सनना हे कोडं उलगडेना.  ते त्या कारकुनाला म्हणाले,  "ही कसली पद्धत!  त्यांनाच पहिल्या तारखेच्या आधी चेक द्यायचं खास कारण?"
"तुम्ही नवखे आहात.  तुम्हाला मजा दाखवतो.  इकडे या आणि बघा."  कारकुनाने परत तो खण काढून पालथा केला.
"बघितलंत!  हे सारे डॉ. कार्व्हर यांच्या नावाचे चेक्स!"
"काय हो! त्यांच्याकडे तर रग्गड पैसा दिसतोय.  संशोधनातून बरीच कमाई झालेली असणार.  आणि तरीही पहिल्या तारखेच्या आधी -?"
"तुम्ही गल्लत करत आहात, विल्सन,"  त्यांना अडवत कारकून म्हणाला,  "हे सर्व त्यांच्या पगाराचे चेक्स आहेत.  नीट बघा.  आत्ता दिलेल्या चेकनंतर ह्या १ मे १९१५ तारखेच्या चेकची पाळी आहे."  तळचा चेक काढून कारकुनाने विल्सनना दाखवला.  "आत्ता जो चेक मी डॉ. कार्व्हरना दिला, तो होता एप्रिल १९१५ साठी दिलेला, आणि आता पुन्हा कधी ते येतील तेव्हा त्यांना हा १ मे १९१५ चा चेक द्यायचा!!"
"पण हे तर १९२३ साल चालू आहे -"  विल्सन.
"नाही कोण म्हणतं? आता लवकरच आपल्याला त्यांच्यासाठी नवीन खणाची तरतूद करावी लागणार आहे.  त्यांच्या दर महिन्याच्या पगाराचा चेक बँकेत जमा होत असतो."
"म्हणजे?  इतकी वर्षं हे चेक्स नुसते पडूनच आहेत?  मग त्यांचे आर्थिक व्यवहार कसे चालतात?"  विल्सनच्या शंका फिटेनात.
"ते काहीही असेल!  पण एक सांगतो; इतक्या वर्षांंत मी त्यांच्या नावे शिंप्याचं एकही बिल आलेलं पाहिलं नाही.  दुसरं म्हणजे, आत्ता इतक्या वर्षांनंतरही त्यांच्या पगारात दिडकीचीही वाढ झालेली नाही."
"खेदाची गोष्ट आहे ही!  एवढ्या थोर संशोधकाची एवढी घोर उपेक्षा!  अशी परवड!!"
"कसली उपेक्षा?  कसली परवड?  कसला खेद?  कित्ती वेळा डॉ. वॉशिंग्टन यांनी आणि त्यांच्यानंतरच्या अध्यक्षांनी त्यांना पगारवाढ देऊ केली!  पण हा भला गृहस्थ ती स्वीकारेल तर ना!  'मला पैसा काय करायचाय?  मी तर साधा भूमिपुत्र.'  हेच त्यांचं उत्तर."

श्री. विल्सन यांनी १९२५ साली अ‍ॅलाबॅमा सोडलं.  तोपर्यंत डॉ. कार्व्हरनी जेमतेम १९१६ सालापर्यंतचे चेक्स नेले होते.  प्रा. कार्व्हर यांनी १८९६ मध्ये घेतलेला पहिला पगार आणि १९४३ साली घेतलेला (मृत्यूपूर्वीचा) शेवटचा पगार यांत सेंटचाही फरक नव्हता.  दरमहा सव्वाशे डॉलर्स!

पुस्तकात सरकवलेले, टेबलाच्या खणात टाकलेले, असे कितीतरी चेक्स कितीतरी गरजू विद्यार्थ्यांचं भलं करून गेले.  अडचणीच्या वेळी घेतलेले पैसे विद्यार्थी परत करायला जाई तेव्हा -
"मी कधी दिले रे बाबा तुला पैसे?"
असं म्हणून ते त्याला लटकं रागावत आणि पैसे नाकारत.  किती विद्यार्थ्यांना त्यांनी अशी मदत दिली होती त्याचा नक्की आकडा देता येणं अशक्य आहे;  कारण या 'गुपचूप' मदतीची नोंद कुठेच नाही.  पण टस्कीगीतील प्रत्येक विद्यार्थ्याला या ना त्या प्रकारे प्रा. कार्व्हर यांची मदत मिळालेली आहे.

कठीण प्रसंगात त्यांच्या निखळ स्वभावाचं आगळंच झळझळीत दर्शन घडे.  त्यांनी न वटवलेले चेक्स इतस्ततः पडलेले असत.  ते जमा करून बँकेत भरावेत म्हणून बँकेचा कोषाधिकारी लोगन - हाही त्यांचाच विद्यार्थी - याने लकडा लावला.  बरीच खटपट करुन त्याने सारे चेक्स बँकेत जमा करायला लावले.  आणि दुर्दैव म्हणजे त्याच साली - १९३३ मध्ये - फेब्रुवारी महिन्यात अमेरिकेला मंदीचा तडाखा बसला.  बँकांचं दिवाळं निघालं.  टस्कीगीची बँकही त्यातून सुटली नाही.  

कोषाधिकारी लोगन अपराधी चेहर्‍याने त्यांना भेटायला आला व ओढवलेल्या आपत्तीची कल्पना देऊ लागला.  आयुष्याची सारी 'कमाई' घालवून बसलेल्या डॉ. कार्व्हरनी त्याला काय उत्तर द्यावं?

"जिकडे तो पैसा गेला तिकडे तो माझ्यापेक्षा नक्कीच जास्त उपयोगी पडेल.  गरजूंना त्याचा उपयोग होतोय यात वाईट ते काय?"

जेव्हा त्यांच्या अवतीभोवतीचं जग पैशासाठी कष्टत होतं, पैशासाठी भांडत होतं, पैशासाठी जगत होतं, पैशासाठी मरत होतं, त्या वेळी डॉ. कार्व्हर पैसा हे एक विनिमयाचं किरकोळ साधन म्हणून त्याचा गरजेपुरताच वापर करत होते.  त्यांना पैशाची गरज बहुधा नसेच.  पैशाचा मोह कसा तो नव्हताच.  सारी भूमी ज्याची, त्या भूमिपुत्राला पैसा हवाच कशाला!  पैशाच्या, धनाच्या मोहाला बळी पडण्यापेक्षा आपलं कौशल्य, आपला सुहृद्भाव आजूबाजूच्या लोकांच्या उपयोगी पडू देण्यात, त्यांचा उत्कर्ष साधण्यात त्यांनी धन्यता मानली.  पैशाचं आमिष दाखवून टस्कीगी शाळेपासून त्यांना दूर नेण्याचे कित्येकांनी प्रयत्न केले;  पण डॉ. वॉशिंग्टनना दिलेल्या वचनाला हा भूमिपुत्र अखेरपर्यंत जागला.  आपल्या कर्मभूमीत - टस्कीगीत - त्यांनी अखेरचा श्वास सोडला.

*****

सतत पंधरा वर्षं त्यांच्या विनाशुल्क सल्ल्याचा बहुमोल लाभ ह्यूस्टन उद्योगसमूहाला मिळत राहिला.  ह्यूस्टन त्यांना भेटण्यासाठी महिन्यातून एकदा न चूकता येतः  भेटीदाखल काही देण्याचा प्रयत्न करतः  पण या नि:संग, नि:स्पृह भूमिपुत्राला लालसा, मोह कसे ते नव्हतेच.  डॉ. कार्व्हरना कशाची तरी गरज पडावी आणि ती गरज अपूर्वाईने भागवण्याचं भाग्य आपल्याला लाभावं अशी ह्यूस्टन यांची इच्छा असे.  पण इथे 'गरज' होती कुणाला?
"मी तुम्हाला कौतुकाने काही द्यावं आणि ते तुम्हाला उपयोगी पडावं, असं या जगात काहीच नाही का?  तुम्ही माझ्याकडे काही मागावं,  असं या जगात काहीच नाही का?"  असं ह्यूस्टन यांनी शेवटी अगदी निकरावर येऊन विचारलं.

निरिच्छ, निर्मोही डॉ. कार्व्हरनी थोड्याशा संकोचानेच आपली मागणी उद्योगपती श्री. ह्यूस्टन यांच्यापुढे ठेवली.
"मला एक हिरा हवा आहे!"
ही मागणी ऐकून ह्यूस्टन यांना आनंद झाला.  'डॉ. कार्व्हरनी माझ्याकडे काही मागावं आणि मी ते आवर्जून द्यावं', ही त्यांची इच्छा पुरी झाली होती.  मोठ्या उत्साहाने ह्यूस्टन यांनी आठवड्याच्या आत एक सुरेखशी हिर्‍याची अंगठी डॉ. कार्व्हरना धाडून दिली.  पुढच्या भेटीत त्यांनी मोठ्या आशेने डॉ. कार्व्हरना विचारलं,
"भेट आवडली ना?"
"हो हो! फारच सुंदर!"
"मग तुम्ही ती अंगठी वापरत नाहीत ते?"
"वापरत नाही?  म्हणजे?  मी तो हिरा बोटावर मिरवायला मागितला होताम, असं वाटलं की काय तुम्हाला?  तो मला हवा होता यासाठी -"  असं म्हणून डॉ. कार्व्हरनी ह्यूस्टनना एका काचेच्या कपाटापाशी नेलं.  त्या कपाटात 'खनिजांचा संग्रह' होता.  तो दाखवत ते पुढे म्हणाले,  "या माझ्या संग्रहात वाण होती ती फक्त हिर्‍याची.  माझ्या विद्यार्थ्यांना मला इतर सारी खनिजं दाखवता येत होती;  फक्त हिरा दाखवता येत नव्हता.  तुम्ही माझी अडचण दूर केलीत.  आता हिरा कसा असतो हे जाणून घेण्यासाठी विद्यार्थ्यांना कल्पनाशक्तीवर विसंबून राहायला नको."
ह्यूस्टन यांना पुन्हा एकदा हार मानावी लागली.  डॉ. कार्व्हरनी हिरा मागितला होता तोही 'एक खनिज' म्हणूनच!

कोणत्याही आमिषाला बळी न पडलेल्या प्रा. कार्व्हरांना वैयक्तिक पातळीवर काहीच नको असे;  पण आपल्यामुळे आपल्या वंशाला इतरांनी समजावून घ्यावं असं त्यांना वाटे.  'मी इतकी वर्षं दक्षिणेत माझ्या लोकांसाठी घालवल्यानंतर, आता मी जर माझं कार्य अर्धवट स्थितीत सोडून गेलो तर ते काम माझं म्हणून ओळखलं जाणार नाही.  माझ्या वंशाच्या लोकांना त्याचं श्रेय मिळणार नाही.  मी जे काही करतो आहे त्याचा लाभ,  त्याचं श्रेय माझ्या वंशाला मिळालंच पाहिजे.'

*****
दूरिताचे तिमिर जावो...

डॉ. कार्व्हर यांची देशभक्ती अवघ्या वर्णविखाराला पुरून उरली होती.  १९१७ साली पहिल्या महायुद्धाच्या वेळी, 'टस्कीगी'तून बरेच विद्यार्थी वॉशिंग्टन येथील "हॉवर्ड युनिव्हर्सिटी'त खास प्रशिक्षणासाठी पाठवले होते.  प्रत्यक्ष राजधानीत मिळालेल्या सापत्नभावाची तक्रार जेव्हा टस्कीगीचे विद्यार्थी डॉ. कार्व्हर यांच्याकडे करू लागले तेव्हा डॉ. कार्व्हर आपल्या विद्यार्थ्यांना म्हणाले,
"तुम्ही देशासाठी लढायला गेला होतात, तेव्हा इतर कमी महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा.  अज्ञानाचा, द्वेषाचा मक्ता अमुक एका शहराकडे आहे, असं तुम्हांला कोणी सांगितलं?  दक्षिणेत काय किंवा उत्तरेत काय, मूर्खशिरोमणी हवे तेवढे सापडतील.  आपल्या कर्तव्यपूर्तीच्या आड वर्णद्वेष्टे येणार नाहीत, याची योग्य ती खबरदारी तुम्हीच घ्यायला हवी.  वेळ येईल तेव्हा त्यांना त्यांची चूक उमगेल आणि त्या वेळी तुम्ही खरोखरच मुक्त होऊन इतरांच्या खांद्याला खांदा भिडवून चालू शकाल.  निग्रो करू शकत नाहीत अशी गोष्ट या जगात नाही, हे त्यांना आपल्या कृतीने सिद्ध करून दाखवा.  तुम्ही असे स्वयंसेवक व्हावं म्हणूनच 'टस्कीगी' तुमच्या सर्वांगीण विकासाची काळजी घेते....

"आपल्या संस्थेत शिकणार्‍या मुलांच्या उणिवा 'बाहेर' तिखट-मीठ लावून सांगितल्या जातात,  टवाळीचा विषय ठरवल्या जातात,  तेव्हा तुम्ही संतापता.  आपली लायकी सिद्ध करायला उतावीळ होता.  पण थांबा!  ठोशाला ठोसा देऊन काय प्राप्त होईल?  उलट आपल्या संस्थेचाच पाया उखडला जाईल.  तेव्हा अगदी कटुतम टीकासुद्धा,  आपल्यातील दोष दूर करण्यासाठीच आहे असं मानून, पुढे जात राहा!  माणसाच्या लायकीचा पुरावा देतं त्याचं ज्ञान,  वर्ण नव्हे..."  ("If you have nothing but complexion to recommend you,  you have no recommendations.  If you know anything,  you recommend yourself.")
उन्हाळ्याच्या सुट्टीत अनेक गोरे विद्यार्थी रसायनशास्त्राचा 'सखोल' अभ्यास करण्यासाठी डॉ. कार्व्हरांच्या वर्गाकडे येत.  कारण एरवी तसं येणं त्यांना 'अधिकृत'पणे शक्य नसे.  पण डॉ. कार्व्हरनी कोणताही राग मनात न ठेवता ज्ञानदान केलं.

जगप्रसिद्ध झाल्यावरही डॉ. कार्व्हर वर्णद्वेष्ट्यांच्या त्रासातून सुटू शकले नाहीत.  टस्कीगीत येऊन चाळीस-पंचेचाळीस वर्षं लोटली तरीही सामाजिक विषमता १८९६ सालातलीच होती.  अस्पृश्यांप्रमाणे वाळीत टाकलेला निग्रो समाज अजूनही वर्णभेदाची, वर्णविखाराची शिकारच होता!
दक्षिणेत तर निग्रोंच्या डोक्यावर सतत टांगती तलवार असे.  जरा कोणी वावगं वागलं की 'निग्रोंकडून यापेक्षा आणखी वेगळी कसली अपेक्षा ठेवावी?',  त्यांच्या हातून चांगलं, उजवं घडलं की  'त्याच्यात नक्कीच गोरं रक्त असलं पाहिजे,  त्याशिवाय तो गोर्‍यांच्या तोडीचं काम कसं करील?'
डॉ. कार्व्हरांच्या रक्ताबाबतही असेच वाद.  'त्यांच्या अंगात कुठंतरी गोरं रक्त असलंच पाहिजे.  त्याशिवाय का ते इतके हुशार!'  पण डॉ. कार्व्हरना मात्र हे कधीच मान्य नव्हतं.  ते स्वतःला शंभर टक्के निग्रो म्हणवत.

त्यांच्या 'निग्रो' असण्याने,  आयुष्य समृद्ध बनवणार्‍या अनेक गोष्टींपासून त्यांना वंचित व्हावं लागलं.  अनेक सुंदर,  उपयुक्त गोष्टींचा आस्वाद त्यांना कधी मनसोक्तपणे घेताच आला नाही.  एखाद्या सुंदर बागेत मोकळेपणी फिरावं,  एखाद्या कलाप्रदर्शनात किंवा संगीताच्या एखाद्या मैफलीत स्वतःला विसरून जावं,  असं कधी जुळून आलंच नाही;  कारण अशा ठिकाणी निग्रोंना मज्जाव असे.  त्यांच्या नावाच्या गवगव्याने त्यांना अशा एखाद्-दुसर्‍या सार्वजनिक ठिकाणी प्रवेश मिळाला असताही.  पण त्या वेळी आजूबाजूने होणारी कठोर टवाळी त्यांना सहन करावी लागली असती.  घाणीत राहून सुवास कसा लुटणार?  अपमानित मनाने आनंद कसा लुटणार?  भावनांची तार तुटल्यावर कानावर पडणारं संगीत सुरेल कसं वाटणार?  दु:खी मनाने आनंद कधी लुटता येतो का?
वर्णद्वेषाची तीव्र झळ सोसूनही त्यांनी आपल्या मुखावाटे कटू शब्द बाहेर पडू दिले नाहीत.  "माझ्या तोंडावर पाणी फेकून  'हा पाऊस आहे!'  असं ते भासवू शकत नाहीत.  मी द्वेष करावा इतक्या खालच्या पातळीवर मला कोणी खेचू शकत नाही...  माझ्यावर अनेक अन्याय झाले.  पण प्रत्येक वेळी अन्यायाचं निराकरण करून घेण्यासाठी मी माझी शक्ती,  बुद्धी पणाला लावली असती तर माझं जीवितकार्य तडीस नेण्यासाठी माझ्याकडे शक्तीच उरली नसती."

वंशभेदाच्या भोवर्‍यात सापडून आपल्या कार्याला कमीपणा आणण्यापेक्षा,  आपल्या स्थानी अढळ राहून कार्यरत राहणं त्यांनी पसंत केलं.  त्यांच्या अविचल निष्ठेमुळेच त्यांच्या हातून लोकोत्तर समाजसेवा घडली.  केवळ आपल्या बांधवानांच नव्हे,  तर उभ्या दक्षिणेला दारिद्र्याच्या चिखलातून बाहेर काढण्यात ते यशस्वी झाले.  त्यांच्या नि:स्पृहतेमुळे,  निष्काम कर्मयोगामुळे ते केवळ टस्कीगीलाच नव्हे, तर संपूर्ण मानवजातीला आदरणीय ठरले.  प्रा:स्मरणीय झाले.  देवदत्त हात आणि मन यांच्या आधारे एक मनुष्य अवघ्या राष्ट्राची,  अखिल मानवजातीची किती स्पृहणीय सेवा करू शकतो याचं आदर्श उदाहरण म्हणजे डॉ. कार्व्हर!

डॉ. कार्व्हर यांच्या रूपाने निग्रो वंशाच्या गेल्या अनंत पिढ्यांतील  गुण,  कला,  आकांक्षा शुद्ध स्वरूपात विकसित होऊन जगापुढे अवतरल्या होत्या.  त्यांच्या मृदू वाणीने,  ऋजू स्वभावाने आणि तरल सर्वस्पर्शी प्रतिभेने त्यांच्या सहवासात येणारा प्रभावित होई.  उद्धटपणा त्यांच्या स्वभावातच नव्हता.  तो गुण परमेश्वराने त्यांच्या विरोधकांसाठी राखून ठेवला होता.  

गोर्‍यांचा उद्दामपणा डॉ. वॉशिंग्टन काय किंवा डॉ. कार्व्हर काय किंवा टस्कीगी शाळावाले काय,  का खपवून घेत,  असा नंतर निग्रो नेते त्यांच्यावर आक्षेप घेत.  पण त्या दोघांनाही टस्कीगी शाळा वाचवायची होती.  रुजू लागलेलं झाड समूळ उखडलं जाण्यापेक्षा ते जोमदारपणे कसं वाढेल,  याची काळजी घ्यायला हवी होती.  म्हणून वेळप्रसंगी अवहेलना सहन करूनही ते शाळेला धक्का लागू देत नसत,  आणि या दोघांचं असामान्यत्व जाणून असणारी इतर टस्कीगी शाळावाली मंडळी त्यांच्या  'सुजाण मानव'  बनवण्याच्या कार्यात अडथळे येऊ नयेत,  ते कार्य खंडित होऊ नये,  म्हणून मन व्यथित करणार्‍या घटनांकडे दुर्लक्ष करून त्या दोघांना सहकार्य देत होती.  ऑस्टिन कर्टिस विचारतो,  "आताची निग्रो नेतेमंडळी कुठून उगवली? कार्व्हर किंवा वॉशिंग्टन यांच्या नि:स्वार्थी समर्पित जीवनाचं खतपाणी घेऊन मशागत झालेल्या समाजातूनच ना!  की ती आकाशातून टपकली?" 

*****
सुखिया जाला

विज्ञानशाखेत निग्रो मुलांनी कितीही हुशारी दाखवली तरी स्वतःच्या उत्कर्षासाठी त्यांना त्या अभ्यासाचा उपयोग करता येत नसे.  पदवी घेऊन बाहेर पडलेल्या निग्रो केमिस्टला सौंदर्य-प्रसाधनं किंवा फार तर एखाददुसरं 'पेटंट औषध' तयार करण्यापलीकडे अन्य काही बनवण्यास वाव नसे.  व्यावसायिक प्रयोगशाळांतून  'निग्रोंना मज्जाव'  अशा अलिखित पाट्या.  काही ठिकाणी तर कायद्याने बंदी.  अशा परिस्थितीत मोठ्या कष्टाने आत्मसात केलेलं ज्ञान त्यांना खर्‍या अर्थाने वापरून पाहता येत नसे.  त्यामुळे साहजिकच, पुढे निरुपयोगी ठरणार्‍या या विषयांकडे विद्यार्थ्यांचा ओढा कमी झाला.  हा फार मोठा धोका होता.  हुशार मुलांची बुद्धी वाया जाणार होती.  डॉ. कार्व्हरांनी इलाज शोधला.  'कार्व्हर-प्रतिष्ठान'  स्थापन करण्यात आलं.  

'मी,  जॉर्ज डब्लू. कार्व्हर,  स्वतः उभारलेलं  'कार्व्हर-प्रतिष्ठान'  माझ्या जवळच्या मिळकतीसह (तेहतीस हजार डॉलर्स) टस्कीगी संस्थेला अर्पण करत आहे.'  -  वृत्तपत्रातील ही बातमी सार्‍या जगाला अवाक् करून गेली.  

हे प्रतिष्ठान उभारण्याचं त्यांचं स्वप्न साकार करण्यात अनेकांचा हातभार लागला.  जवळ जवळ दोन लाख डॉलर्स किमतीची वास्तू उभी राहिली.  हजारो संशोधकांना,  विद्यार्थ्यांना तिचा लाभ मिळाला.  विज्ञान विषयात गती असणार्‍या मुलांनाअ प्रगत अभ्यासक्रमात प्रयोगशाळेची उणीव भासू नये, म्हणून आपल्या आयुष्यभराची साठवण खर्च करून त्यांनी हे प्रतिष्ठान उभारलं.

उजाड माळावर फुलबाग फुलवल्याबद्दल,  आपले हात केवळ निर्मितीसाठी वापरल्याबद्दल,  डॉ. वॉशिंग्टन यांना दिलेल्या वचनाची पूर्तता केल्याबद्दल त्यांना संस्थेने जे काही मानधन दिलं होतं,  तेही त्यांनी संस्थेला साभार परत केलं होतं.  कारण ते जाणून होते,  काळाच्या उदरात त्यांनी उत्तम बी पेरलं होतं.  डोळस कष्टांच्या खतपाण्याने अंकुरलेल्या कार्याने मूळ धरलं होतं.  नवीन धुमारे फुटत होते.  लवकरच फळं लागणार होती.

त्यांच्या द्रष्टेपणाचं,  कार्यरत वृत्तीचं कौतुक करणारा,  त्यांच्या लोकोत्तर समाजसेवेचं गुणगान करणारा जेव्हा त्यांचे आभार मानु लागे तेव्हा ते विनयाने म्हणत -
"माझी नाहीतर आणखी कोणाची नियुक्ती या कामी करून देवाने आपलं काम करवून घेतलं असतंच.  त्याने माझी निवड केली यात माझी प्रशंसा करण्याजोगं काय आहे?"

खरंच, अशा गुणी माणसाची नियुक्ती करून देवाने स्वतःचं देवपण राखलं होतं.  

*****
महानिर्वाण


टस्कीगीचं वातावरण गेले काही दिवस जरा उदासच भासत होतं.  दोन आठवड्यांपूर्वी पोर्चबाहेरच्या बर्फावरून डॉ. कार्व्हरांचा पाय घसरला.  जवळून जाणार्‍या विद्यार्थ्यांनी त्यांना सावरलं.  त्यांच्या सांगण्यावरून ते त्यांना प्रयोगशाळेत घेऊन गेले.  थोडा वेळ तिथलं काम पाहून लंगडत लंगडत कार्व्हर आपल्या ऑफिसात गेले.  कर्टिसशी बातचीत केली.  मग आपल्या खोलीत परतले.  ते पुन्हा बाहेर न येण्यासाठीच.  सारी टस्कीगी चिंताग्रस्त होती.

डॉ. कार्व्हरनी पडल्या पडल्या निरवानिरव करण्यास सुरुवात केली होती.  संस्थेचे अध्यक्ष पॅटरसन यांना बोलावून त्यांच्या हाती 'राष्ट्रीय बचत योजने'च्या रोख्यांचे पैसे दिले  -  "हे प्रतिष्ठानच्या कामी वापरा आणि जगाला कळू द्या, मी हे मुद्दाम विकत घेतले होते.  देशभक्ती ही कोणत्याही वर्णाची मक्तेदारी नाही.  ती बंधनातीत आहे..."
शेवटपर्यंत ते आपल्या कामाची व्यवस्था लावून देत होते.  सवड मिळेल तेव्हा मारियाआत्याने दिलेलं कातडी बांधणीचं बायबल वाचत होते.

बायबल वाचताना त्यांना मारियाआत्या दिसत होती.  तिने घातलेली आण - खूप खूप शीक आणि तुझ्या ज्ञानाचा उपयोग तुझ्या बांधवांसाठी कर...
चित्रकार किंवा संगीतकार व्हायचं होतं...  बाकी त्या हौशी भागवून घेतल्याच जमतील तशा...  हे जातिवंत माळ्याचे हात...  यायगरला आवडलेले...  आपल्या बांधवांचं जीवन सुसह्य करण्यासाठी खूप धडपडले.
पाऊस कसा पानापानांतून ठिबकतोय.  अलगद हिरव्या धरित्रीवर उतरतोय.  हलकेच जिरतोय.  कुठे गेला त्याचा आक्रस्ताळेपणा...  ही खिडकीतून डोकावणारी फांदी तर नात्याचीच आहे.  फार पूर्वी लावलेल्या रोपांपैकी हे एक.  केवढं उंच वाढलंय,  डेरेदार पण झालंय...  डॉ. वॉशिंग्टन आज तुम्ही हवे होतात.  साधी हिरवळ रुजली,  तर किती आनंद झाला होता...  आता हे सूर्याचे किरण अंगावर पडू न देणारे टस्कीगीचे रस्ते अन् हा पर्णाच्छादित अ‍ॅलाबॅमा पाहून किती आनंदला असता तुम्ही!...
चर्चमधल्या ऑर्गनचे सूर वातावरणात भरून राहिलेत.  मिलहॉलंडबाई पियानो काय सुरेख वाजवायची.  पण तिचं वादन ऐकताना का कुणास ठाऊक,  खूप रडू आलं होतं.  खरं म्हणजे संगीताने मन कसं शांत व्हावं...  अगदी आत्ता वाटतंय तसं... 

अंधार पडू लागलाय.  हवेत गारठा वाढतोय...  या कोटानं बरीच वर्षं ऊब दिली.  काय उत्साहानं त्या मुलांनी माझ्या अंगावर चढवला होता हा!  नाही तरी अशा कोटांची ऊब काही वेगळीच...सुखद...
जिमदादाचं हे एवढंच रूप लक्षात...  कधी तरी नीओशोच्या जत्रेत काढलेला फोटो...  बाकी हा नशीबवान...  कशी कुणास ठाऊक,  पण याला  'आई'  म्हणून हाक तरी मारायला मिळाली.
कशाचीच आस नव्हती.  एका परमेश्वराशिवाय कोणाची बांधिलकी नव्हती.  एका भूमीखेरीज कोणाशीच जवळीक नव्हती.  अखंड पोरकेपणाने सावलीसारखी सोबत केली होती...
स्वतःचं  'काहीच'  नसलेला हा मुक्तात्मा सार्‍या जगाला उधळून आता पंचतत्त्वांत विलीन होत होता.  इतिहासातलं आपलं स्थान अढळ करून प्रयाणाला निघाला होता.
टस्कीगीने त्यांचा अखेरचा श्वास ऐकला.  ५ जानेवारी १९४३.

सत्तावीस वर्षांपूर्वी डॉ. वॉशिंग्टननी जिथे चिरनिद्रा घेतली,  त्याच टेकडीवर त्यांच्याच शेजारी जॉर्ज डब्लू. कार्व्हरना 'काळ्या आई'च्या स्वाधीन करण्यात आलं.

त्यांच्या दफनानंतर आठवड्याभराने कर्टिसला बेल्जियन काँगोच्या एका मिशनर्‍याचं पत्र आलं.  पत्रात त्याने म्हटलं होतं...
"आम्ही गेली पंचवीस वर्षं डॉ. कार्व्हर यांचे ऋणी आहोत.  त्यांनी भुईमुगापासून बनवलेल्या दुधानं आमच्यावर अनंत उपकार केले आहेत.  आफ्रिकेच्या अंतर्गत भागात त्सेत्से माश्या व हिंस्त्र श्वापदं यांच्यामुळे दुभती जनावरं पाळता येत नसत.  तेव्हा मातेचं स्तन्य मिळू न शकणार्‍या नवजात बालकांच्या पोषणाचा यक्षप्रश्न उभा ठाके.  १९१८ साली पत्र पाठवून आम्ही ही अडचण डॉ. कार्व्हर यांना कळवली.  त्यांनी भुईमुगाविषयी माहिती देऊन त्यापासून दूध कसं तयार करावं याची कृती विशद केली.  त्यायोगी आम्ही शेकडो बालकं वाचवू शकलो.  त्यांचे आभार मानण्यासाठी शब्द अपुरे आहेत;  पण या दु:खद प्रसंगी मला तसा प्रयत्न करू द्या.
डॉ. कार्व्हर यांच्यामुळेच जगू-वाचू शकलेल्या आमच्या लोकांच्या वतीने मला आभार मानायचे आहेत.  डॉ. कार्व्हर यांचा सहवास लाभलेल्या आपणा सर्वांचे मी कृतज्ञतापूर्वक आभार मानतो आहे.
'जगाने एक तपस्वी साधुपुरुष गमावला आहे;  पण त्यांच्याइतका  'स्वर्गीय निद्रेवर'  दुसर्‍या कोणाचा अधिकार आहे?'

'He could have added fortune to fame
but caring for neither,
he found happiness and honour
in being helpful to the world'


एक होता कार्व्हर : वीणा गवाणकर
राजहंस प्रकाशन
मूल्य : रु.२२५/-
पृष्ठे : १८०