Tuesday, January 7, 2014

जीवन म्हणजे एक प्रचंड मौज आहे


दहा वर्षांपूर्वीं ‘मी कसा झालो?’ हे माझे ‘वाङमयीन आत्मचरित्र’मी प्रसिद्ध केले. आज माझ्या जीवन-चरित्राचा पहिला खंड प्रसिद्ध होतो आहे. त्यामध्ये जन्मापासून तो वयांच्या तिसाव्या वर्षापर्यंतच्या वृत्तांत मी सांगितलेला आहे. असे निदान आठदहा तरी खंड प्रसिद्ध होतील. मराठी भाषेतच काय, पण जगामधील कोणत्याहि भाषेत एका माणसाचे  एवढे मोठे आत्मचरित्र प्रसिद्ध झाल्याचे मला तरी निदान माहित नाही.
     
कोणी विचारील, की एका लहान माणसाने इतके मोठे आत्मचरित्र काय म्हणून लिहावे? त्याला उत्तर असे की, ह्यात ‘मी’ला महत्त्व नाही. गेल्या पन्नास वर्षांत महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ऐतिहासिक, राजकीय, सामाजिक आणि वाङमयीन घडामोडी घडल्या, त्यांच्या इत्थंभूत वृत्तांत सांगण्यासाठी ‘आत्मचरित्र’ हे एक माझे निमित्त आहे. हे मराठी सामाजाचे चरित्र आहे. मी पाहिलेलया, मी ऐकलरल्या आणि मी अनुभवलेल्या अनेक व्यक्तीचे, घटनांचे, गोष्टींचे आणि अनुभवांचे हे चरित्र आहे. माझे काम पुष्कळसे प्रेक्षकाचे आणि निवेदकांचे आहे.
     
‘तुम्ही कोण?’ असे कोणी म्हणेल. मी कोण? मी एक जीवनाचा यात्रेकरु आहे. कसली वा कसली तरी पताका माझ्या खांद्यावर नेहेमी असतेच. जन्मापासून माझ्या पायाला जे  एकदा चक्र लागले आहे. ते एकसारखे फिरतेच आहे. कोणत्याहि एका ठिकाणी मी फार वेळ थांबत नाही. जिथे रंगतो, तिथे काही वेळ थांबतो. कंटाळलो की पुढे चालू लागतो.
     
कोणत्याहि एका व्यवसायांत मला रस नाही कारण, व्यवसाय हे काही माझें जीवन नाही. जीवन हाच माझा व्यवसाय आहे. जीवनाची मला विलक्षण जिज्ञासा आहे. सारे मला दिसले पाहिेज, सारे मला समजलें पाहिजे? सारे मला आले पाहिजे, ही एकच माझ्या जिवाची तडफड असते.
     
आयुष्याला जीवन का म्हणतात? कारण, जीवन म्हणजे पाणी. आयुष्य हे पाण्याप्रमाणे सारखे वहात राहिले, तरच ते जीवन.सांचून राहिलर तर ते डबके जीवन म्हणजे एक प्रंचड मौज आहे. तिचा कितीहि आस्वाद घ्या. कंटाळा कधी येत नाही आणि तृप्ति कधी होत नाही.
     
रोज सकाळी सूर्योदयाबरोबर नवीन जीवन जन्माला येते. चिरंतन नावीन्य म्हणजेच जीवन. जीवनाच्या आकर्षणाला अंत नाही. मला जीवनाचा लोभ नाही पण ओढ आहे. चोहोकडून मला ते हाका मारते. आणि त्या ऐकू आल्या म्हणजे शाळेतून सुटलेल्या पोराप्रमाणे सारे देहकण जीवनाकडे धावत सुटतात.
     
जीवनाचे हे विलक्षण वेड  माझ्यामध्ये कसे आले? लहानपणापासून निसर्गाचूी अन् इतिहासाची मला सोबत मिळाली. ब्रह्मदेवाच्या कमंडलूतून उगम पावलेल्या कर्‍हेच्या कांठी मी जन्माला आलो. आणि तिच्याच अंगाखाद्यावर जेजूरीच्या खंडोबाच्या भंडार्‍याने वाढलो. मोठा झालो. उशाला शिवाजीमहाराजांचा पुरंदर किल्ला आष्टौप्रहर पहारा करी. तर श्री सोपानदेवांची भक्तिवीणा शेजारी सदैव वाजे.
     
शक्तीचे आणि भक्तीचे पावनतीर्थ होते माझे सासवड गांव. महाराष्ट्रातील संताच्या नि वीराच्या पदस्पर्शाने त्याचया भूमीचा कण न् कण पुनीत झालेला आहे. शिवशाहीचा नि पेशवाईचा महत्त्वाचा इतिहासच मुळी त्याच्या पंचक्रोशीत घडलेला आहे. आजहि सासवडच्या रस्त्यांतून जाऊ लागले. की उंच उंच वाडयांच्या पडक्या भितीवरुन दोनतीनशे वर्षांचा इतिहास तिमच्या कानांत कुजबुजू लागतो. ज्ञानोबाची पालखी दर वर्षीं सोपानदेवाचे दर्शन घेऊनच पुढे पंढरीला जाते. त्यावेळी आमच्या गावात दिड्यापतकांची अशी गर्दी उडते आणि टाळमृदुंगाच्या नि ग्यानबातुकारामांच्या गजराने सारे शिवार असे दुमदुमते म्हणत! बालपणांत झालेल्या ह्या सर्व संस्कारांनी माझा पिंड घडविलेला आहे.
     
जे रम्य आणि भव्य आहे, त्याचें सर्धन खेडेगांवातच घडते. पावलोपावली परमेश्वर तुमच्याशी बोलत असतो तिथे. त्याची कृपा नदीच्या रुपाने तुमच्या घराजवळून वहात असते. शिवारामधल्या शेतांत डोलणार्‍या पिकावरचा वारा परमेश्वराचा सुवासिक श्र्वासच प्रतिक्षणी घेऊन येतो. शहरांत रहावयाला आलो, तरी निसर्गाची संगत मी कधीच सोडलेली नाही. मुंबईचा सागर आणि खंडाळयाचा डोंगर हे माझे सोबती आहेत.
     
जीवनाच्या आनंदामधूनच माझे वाङमय वेड निर्माण झाले आहे. वाङमयापेक्षा मला अधिक प्रिय काही नाही. वाङमय म्हणजे जीवनाचा अनुभव. जीवनाचा शोध जीवनाचे जेजे अनंत साक्षात्कार मला घडले, ते प्रकट करण्यासाठींच मी वाङमयाचा आसरा घेतला. मी आयुष्यांत पुष्कळच भटकलो. पण वाङमयाची सोबत कधी सोडली नाही. जीवनाची सेवा मी वाङमयाने केली.
     
मी उपदेशक नाही. उपासक आहे. सिद्ध नाही. साधक आहे. समाजातील अनंत दुःखाची आणि दन्यांची मला जाणीव आहे. त्यांजवर फुंकर घालण्याचाच माझ्या लेखणींने मी सतत प्रयत्न केला आहे. रंजल्यागांजल्याचा कैवार घेण्यांतच मी माझे सामर्थ्य खर्च केले आहे. जगातील म्लान वदने प्रफुल्लित कशी होतील ह्याचीच मी सदैव चिंता केली आहे. माझ्या दोषांची आणि चुकींची मला जाणीव आहे. पण सज्जनांच्या निदेचे पाप माझ्या हातून कधी घडलेले नाही. लोकगंगेचे जीवन गढूळ करण्याचे दुष्कर्म मी कधी केलेले नाही.
     
मी गुणांचा पूजक आहे. हे माझे सर्वांत मोठे सामर्थ्य आहे. भुंगे जसे फुलांवर झेप घेतात, तसे गुण मला दिसले रे दिसले की मी त्यांजवर तुटून पडतो. चांगल्या गोष्टीवर प्रेम करण्याची मला उपजतच आवड आहे. सद्गुणांच्या दाराशी जन्मभर मी जी माधुकरी मागितली, त्याच शिदोरीवर आजपर्यंत मी गुजराण करीत आलो आहे.

कर्‍हेचे पाणी
आचार्य प्रल्हाद केशव अत्रे

Wednesday, January 1, 2014

चतूर माधवराव

प्रस्तावना

दातार छापखाना स्थापन झाल्यापासून "शालिवाहन शक", "मोलकरीण" ही दोन पुस्तके पूर्वी प्रसिद्ध झाली; आणि आता हे तिसरे "चतूर माधवराव" वाचकांच्या सेवेला सादर होत आहे.  आम्ही लिहिलेल्या सर्व पुस्तकांहून याची रचना जरा निराळ्य़ा तर्‍हेची आहे.

आम्ही यापूर्वी ज्या मनोरंजक किंवा बोधपर कादंबर्‍या लिहिल्या त्या सर्व आंग्ल कादंबरीकार रेनॉल्ड्स याच्या कादंबर्‍यांची रूपांतरे आहेत.  परंतू प्रस्तुत पुस्तक हे कोणत्याही पुस्तकाचे किंवा पुस्तकखंडाचे रूपांतर नसून या सर्व गोष्टी स्वतंत्रपणे लिहिल्या आहेत.

नुकतेच ख्रिस्तवासी झालेले सर ऑर्थर कॉनन डाईल यांच्या "शेरलॉक होम्स" च्या धर्तीवर या सर्व गोष्टी अगदी नवीन रचल्या आहेत.  निरीक्षणी, चातुर्य, तर्कशुद्ध विचारसरणी, कल्पकता यांच्या पायावर प्रत्येक गोष्टीची उभारणी केली आहे.  प्रत्येक गोष्टीत बहुधा काहीतरी नवीन तर्कसरणीचा आश्रय केलेला आढळून येईल आणि प्रथमत: कठीण वाटणार्‍या कोड्याचा तार्किक पद्धतीने केलेला उलगडा वाचकांचे मनोरंजन करून त्यांच्या तर्कशक्तीस चालना देण्यास साह्य करील, अशा दृष्टीने प्रत्येक गोष्टीची रचना केलेली आहे.  

या पुस्तकात ’आद्य’ रसाला जागाच नसल्यामुळे हे कित्येकांना रुक्ष वाटेल.  परंतु शृंगार, ग्राम्यता, किंवा अश्लीललता यांपासून या गोष्टी पूर्णपणे अलिप्त ठेवण्याची खबरदारी घेतलेली असल्यामुळे हे पुस्तक तरूणांच्या हाती बिनधोक देता येण्यासारखे आहे.  "कुटूंबातील लहान थोर माणसे एकत्र बसली असता सर्वांसमक्ष जे पुस्तक बिनधोक वाचता येईल, ते पुस्तक चांगले," अशी जी विद्वानांनी चांगल्या पुस्तकाची कसोटी ठरविली आहे त्या कसोटीस हे पुस्तक पूर्णपणे उतरेल असा आम्हास भरवसा वाटतो.

प्रत्येक गोष्टीत माधवराव आणि बळवंतराव अशी दोन पात्रे आहेत.  वाचकांनी आपणास माधवराव न समजता बळवंतराव समजून गोष्ट वाचावी, आणि प्रत्येक गोष्टीत जेथे पूर्वरंगाचे दुवे पुरे होतात, तेथे थोडा वेळ थांबून त्या दुव्यांवरून आपणांस अनुमानश्रुंखला कितपत तयार करता येते, याचा विचार करावा आणि नंतर उत्तररंग वाचावा म्हणजे आपल्या तर्कसरणीपेक्षा माधवरावांची तर्कसरणी कशी सूक्ष्म व शुद्ध आहे हे लक्षात येऊन मनाला समाधान वाटल्यावाचून राहणार नाही, असे आम्हास वाटते.  या कादंबरीतील सर्व गोष्टी ’मधुकर’ मासिकात वेगवेगळ्या वेळी प्रसिद्ध झाल्या आहेत व ’हरवलेली नथ’ ही गोष्ट ’चित्रमय जगत’ व ’मधुकर’ या दोन्ही मासिकातून प्रसिद्ध झालेली आहे.  या गोष्टी जशा त्यावेळी वाचकांस आवडल्या, तशा आताही या स्थायी स्वरूपात आवडतील, अशी अपेक्षा धरणे अस्थानी होणार नाही.  अशा प्रकारच्या निरीक्षणविषयक स्वतंत्र लघुकथांची महाराष्ट्र वाङ्मयात फारच उणीव असल्यामुळे हा आमचा प्रयत्न यशस्वी झाला नाही तरी सरस्वतीमंदिराच्या या दालनात प्रवेश करणार्‍या वाङ्मयसेवकास ’मागच्याला ठेच पुढचा शहाणा’ या न्यायाने हा आमचा अल्प प्रयत्न मार्गदर्शक झाला तरी त्याने पुष्कळच काम केल्यासारखे होईल.

’शेरलॉक होम्स’ जसा इंग्रजी वाचकांस आवडला व त्याची नव्याजुन्या जगात प्रतिष्ठा झाली तसे भाग्य जरी ’माधवरावास’ लाभणे शक्य नाही तरी त्याच्या जनकाच्या या प्रयत्नाबद्दल महाराष्ट्र वाचक त्याचा उपहास तरी करणार नाहीत, अशी आशा बाळगून ही प्रस्तावना पुरी करतो.  

सन् १९३०

गोविंद नारायण दातार

नवरदेवाचे पलायन

लग्न ठरल्यावर ते होऊन जाईपर्यंत वधूवरांची आईबापे त्यांना किती जपत असतात आणि त्यांचे किती लाड करत असतात, हे कोणास नव्याने सांगण्याची जरूरी नाही.  तेवढ्यापुरती आईबापांकडून अथवा सोयर्‍या धायर्‍यांकडून वधूवरांच्या शरीरप्रकृतीसंबंधाने जितकी काळजी व तत्परता दाखविली जाते, तिचा दशांश काळजी जर नेहमी दाखविली जाईल तर अकाली मृत्यूमुखी पडणार्‍या तरूणांची संख्या पुष्कळच कमी होईल, यात शंका नाही.
*******
मवाळांची गणना भित्र्यांमध्ये किंवा स्वार्थसाधूंमध्ये होत असल्यामुळे, आपणास मवाळ म्हणवून घेण्यापेक्षा जहाल म्हणवून घेणे पुष्कळास आवडते.  त्यामुळे जहाल म्हणविणारांची संख्या फुगलेली दिसते खरी, पण कर्तबगारीची वेळ आली की असल्या जहालांपैकी बरेच जण मवाळ तर, नाहीतच, अगदी गचाळ असतात असे आढळते.

पुत्रप्रेम की धनलोभ

माधवरावांना भरपूर काम असले म्हणजे ते करताना त्यांच्या अंगी मोठा हुरूप चढे, पण मनासारखे काम नसले म्हणजे त्यांचा स्वभाव अगदी उदास बने.  ही उदासीनता घालविण्यासाठी ते गंजिफा किंवा बुद्धिबळे खेळत.  तथापिअ त्यांच्या तोडीचा खेळणारा त्यांना नेहमी मिळत नसल्यामुळे खेळातसुद्धा त्यांची निराशाच होत असे.  अशावेळी वर्तमानपत्रामध्ये किंवा मासिक पुस्तकामध्ये प्रसिद्ध होणारे बुद्धिबळाचे कठीण डाव सोडविण्यासाठी मी त्यांच्याकडे नेत असे.  परंतु मौज ही की, तासतास डोके खर्च करून आम्हास जे डाव सुटत नसत असले बिकटा डाव ते सहज चारपाच मिनीटांत सोडवीत.  हे तुम्हाला कसे साधते, असा त्यांना प्रश्न केला असता त्यांनी असे सांगितले:

’स्वाभाविकपणे घडून आलेल्या गोष्टी आणि कृत्रिम रीतीने घडवून आणलेल्या गोष्टी त्यातील भेद तुमच्या लक्षात येत नाहीत म्हणून असे होते.  प्रत्येक गोष्टीची स्वत:ची  -- निसर्गसिद्ध अशी काहीतरी मर्यादा असते.  म्हणून गोष्टी स्वाभाविकपणे घडून येत असता त्यामध्ये मर्यादेचे उल्लंघन झालेले दिसून येत नाही.  परंतु, जेव्हा कृत्रिम गोष्टी स्वाभाविक गोष्टीप्रमाणे भासवावयाच्या असतात, तेव्हा किती जरी खबरदारी घेतलेली असली, तरीदेखील, सूक्ष्म अवलोकन करणार्‍यास कृत्रिम गोष्टींमध्ये मर्यादेचे उल्लंघन झालेले हटकून आढळून येते.  एखाद्या कवीचे किंवा चित्रकाराचे उदाहरण घ्या.  या सृष्टीमध्ये एका ईश्वरावाचून सर्वगुणपरिपूर्ण -- दोषरहित असे काहीच नाही.  मनुष्य-प्राण्याच्या सर्व कृती सदोष असावयाच्याच.  "सर्वारंभा हि दोषेण धूमेनाग्निरिवावृता:।" या सामान्य नियमाला दूर ढकलून कवी आणि चित्रकार आपापल्या कल्पनाशक्ती जोरावर निर्माण केलेल्या काव्यातील अथवा चित्रातील प्रधान वस्तूचे स्वरूप दाखविताना तिच्या ठिकाणी दोषांचा नुसता विटाळदेखील होऊ देत नाहीत.  अशा प्रसंगी ते आपल्या कलेचे घोडे इतके अमर्याद दामटतात की, त्याला तो वेग असह्य होऊन ते मध्येच तोंडघशी पडेल, ही साधी गोष्टसुद्धा त्याच्या लक्षात येत नाही.  प्रत्येक बाबतीत असेच आहे.’  अशा रीतीने त्यांचे तात्त्विक व्याख्यान सुरू झाले म्हणजे त्यांच्या निरीक्षणशक्तीचे व कार्यकारण संबंधाचे पृथक्करण करण्याच्या कौशल्याचे मला मोठे कौतुक वाटे.  

पुढील गोष्ट मी नोकरीस असताना घडलेली आहे.  ते त्यावेळी नुकतेच सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन मोकळे झाले होते.  त्यांचे बुद्धिसामर्थ्य त्यांच्या वरिष्ठांपेक्षा अधिक होते, हेच त्यांना राजीनामा देण्याला कारण.  इतका ’फाजील’ बुद्धिवान नोकर वरिष्ठांना नको होता, आणि अधिकारमताने सर्वज्ञ बनलेल्या वरिष्ठांची खुशामत करण्याची माधवरावांची तयारी नव्हती, म्हणून झाले ते उभयपक्षी इष्टच झाले.  कायमची पेन्शनेबल नोकरी सोडली, म्हणून आम्ही स्नेह्यांनी त्यांना प्रथम दोष देण्यास बिलकूल अनमान केला नाही, पण लवकरच आमची चूक आमच्या लक्षात आली.  इस्लामाबादच्या बेगमसाहेबांच्या चोरीस गेलेल्या जवाहिराचा त्यांनी मोठ्या शिताफीने पत्ता लावून दिला, म्हणून बेगसाहेबांकडून त्यांना जे बक्षीस मिळाले, त्याचे व्याजच त्यांना अर्ध्या पगाराइतके येऊ लागले.
*******
एकदा दरवाज्यातून लांबवर दृष्टी पोचवून व आपले बोलणे आणखी कोणी ऐकत नाही अशी खात्री करून घेऊन तो हलक्या स्वराने बोलू लागला, "माधवराव, माझा सर्वस्वी नाश होण्याची वेळ जवळ आली की काय, अशी मला भीती वाटू लागली आहे.  पैशापरी पैसा जाणार आणि इतके दिवस मिळविलेली अब्रूही गमविण्याचा प्रसंग येतो की काय, असे मला भय पडले आहे..  लोक मला मारवाडी, कंजूष, कवडीचूंबक काय हवे ते म्हणोत, तथापि अनंत धोंडदेव लबाड माणूस आहे असे मात्र कोणाला म्हणता यावयाचे नाही.  लोकांसारखे चैनीत पैसे मी उधळीत नाही आणि कोणाकडे तोंड पसरायलाही जात नाही.  आजपर्यंत निदान पंचवीस वेळा तरी माझे हिशोब सरकारात गेले असतील, पण त्यात कधी तफावत निघाली असे कधीच झालेले नाही.  उलट माझे हिशोब चोख असतात असे एक सोडून दहा शेरे तुम्हाला पाहावयास मिळतील.  मी निढळच्या घामाने पैसे मिळवितो व काटकसरीने खर्च करतो, लोकांच्याने पाहावत नाही. मी व्याजच जबर सांगतो, ते वेळच्यावेळी मिळाले नाही तर व्याजावर व्याज घेतो, अंगभर वस्त्र वापरीत नाही, पोटभर जेवीत नाही, असे माझ्यावर लोकांचे विलक्षण आरोप आहेत."

"माझी खरी स्थिती काय आहे हे तुम्हाला समजल्याखेरीज सध्या मजवर प्रसंग कसा गुदरला आहे हे तुमच्या नीटसे ध्यानात येणार नाही.  लोक मला लक्षाधीश समजतात.  समजेनात! आणि मी जरी लक्षाधीश असलो तरी आणखी पैसा मिळवू नये असे कोणत्या शास्त्रात सांगितले आहे?  आज माझ्यावर जो प्रसंग आला आहे तो पैशाच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचा नाही.  आज माझी अब्रू जाण्याची वेळ आली आहे.
*******
मात्रा लागू पडली, पुत्राच्या अश्रूंनी जे कार्य घडून आले नाही, ते कार्य द्रव्यतृष्णतेने एका क्षणात करून दाखविले!  द्रव्यलोभाने त्या म्हातार्‍याचे मन पुरते व्यापून टाकले आहे, त्यात पुत्रप्रेमाला जागा मुळीच नाही हे माधवरावांनी प्रथमच ओळखले होते.  म्हणूनच त्यांनी मुद्दाम नानासाहेब इनामदारांना तेथे आणून बसवून ठेवले होते.  द्रव्य मिळवून त्याचा संग्रह करणे हेच आपल्या जन्माचे सार्थक असे मानणार्‍या त्या म्हातार्‍याने पुत्राचे कर्ज फेडण्याचे निरूपायाने कबूल केले.  लवकरच आवडीच्या गळ्यात सरी दिसू लागली.  हुंडा न घेता लग्न करण्याची विष्णूपंताची प्रतिज्ञा नानासाहेब इनामदारांनी पूर्ण केली.  त्याच जडावाच्या पाटल्या हाती असलेली नानासाहेबांची कन्या ज्या दिवशी सुनेच्या नात्याने अनंतराव मारवाड्याच्या पाया पडावयाला आली त्याच दिवशी त्या म्हातार्‍याच्या पोटात धुमसत असलेला क्रोधाग्नी पूर्णपणे शांत झाला असे माझ्या ऐकिवात आहे.

तांब्याची पट्टी

माधवराव म्हणाले, "रावसाहेब तुम्ही तर या गोसाव्याचे फारच उत्तम चित्र काढले! पण मी सांगतो, त्याचे पूर्वचरित्र बरेच विलक्षण असले पाहिजे, विरक्तीखेरीज दुसर्‍या कोणत्यातरी कारणाने याने हा वेष धारण केला असावा.  बाह्य आचरणाला व वेषाला गतानुगतिक लोक नेहमी फसत असतात."
मी म्हंटले, "माधवराव, माणसाकडे नुसते पाच-चार मिनीटे पाहून त्याच्याविषयी काहीतरी सिद्धांत ठोकून देणे हे वाजवी नव्हे.  आम्हा शिकलेल्या लोकांना साधुसंतांची अवहेलना करण्याची मोठी वाईट खोड लागली आहे, असे जुने लोक नेहमी म्हणत असतात--"
माझे भाषण पुरते संपण्यापूर्वीच माधवराव म्हणाले, "आणि ते पुष्कळ अंशी खरेही आहे.  तथापि अलीकडच्या लोकात चिकित्सकबुद्धी विशेष असल्यामुळे ते नुसत्या बाह्य देखाव्याला फारसे फसत नाहीत, ही गोष्टही तितकीच खरी आहे."

जुगाराचा भयंकर परिणाम

’सोडतीचे तिकीट घेण्यासंबंधाने तू माझा अभिप्राय विचारलास हे चांगले केलेस.  सोडत हा शुद्ध जुगार आहे, व जुगार हा काही द्रव्यसंपादनाचा नीतीचा मार्ग नव्हे.  सोडतीच्या पैशाने श्रीमंत होऊन चैन मारण्यापेक्षा भिक्षा मागितलेली शतपट बरी, असे माझे स्पष्ट मत आहे.  ईश्वरदयेने जे आपणास मिळत आहे ते काही कमी नाही.  जुगारात मिळालेला पैसा हरामाचा.  तो यशालाभास यावयाचा नाही.  सोडतीत पैसे घालणारा प्रत्येक जण मोठ्या आशेने पैसे घालीत असतो.  आपले पैसे व्यर्थ जाणार ही कल्पना जरी प्रत्येकाला असली, तरी भावी सुखाच्या कल्पना त्याच्या डोळ्यांपुढे नाचत असल्यामुळे केवळ तेवढ्या आशेवरच तो बेफिकीर असतो.  पण सोडतीचा निकाल होऊन निराशा झाली, म्हणजे आपल्या व्यर्थ गेलेल्या द्रव्याची खरी किंमत त्याला कळते, आणि त्याचा जीव तळमळू लागतो.  सोडतीत पैसा घालण्याचा विचार तुझ्यासारखे गर्भश्रीमंतच करते तर गोष्ट वेगळी होती, पण आजचा दिवस कसाबसा गेला, उद्याचा कसा जातो याची ज्यांना भ्रांत असते, असे लोकदेखील सोडतीत पैसा घालतात.  घरी बायकापोरे उपाशी मरत असता केवळ अनिश्चित आशेच्या भरी भरून, मारवाड्याचे कर्ज काढून सोडतीत पैसे घालणार्‍या लोकांची पाच सहा उदाहरणे माझ्या डोळ्यांसमोर आहेत.  सर्वच लोक कर्ज काढतात, किंवा सर्वांसच फुकट गेलेल्या पैशाबद्दल हळहळ वाटते असे माझे म्हणणे नाही.  पण ऐपत नसता सोडतीत पैसे घालणार्‍या लोकांचीच संख्या जास्त हे लोक आपल्या मूर्खपणामुळे तळमळत बसतात, त्याला लोकांनी काय करावे, असा यावर कित्येकांच्या तोंडचा आक्षेप मी ऐकला आहे, पण त्यात काही तथ्य नाही.  मूर्खांना उपदेश करून शहाणे करणे हे जाणत्या लोकांचे कर्तव्य आहे.  त्यांच्या मूर्खपणाचा फायदा घेऊन आपण चैन मारण्याची इच्छा करणे, हे काही माणूसकीचे कृत्य नव्हे.  हा धडधडीत जुलूम आहे.  या सोडतीत घातलेल्या पैशातील अर्धी रक्कम एका धर्मकृत्याकडे जाणार आहे, म्हणून तिकीट घ्यावे असे तू लिहीतोस, यावरूनच तुझ्या मूर्खपणाची व अविचारीपणाची साक्ष पटते.  तुला जर धर्मकृत्याला मदत करावयाची असेल, तर ते एक सोडून दहा तिकिटांच्या किंमतीइतकी रक्कम सरळ धर्मकृत्यास देऊन टाक.  त्याला मी मूळीच नको म्हणणार नाही.  धर्म करावयाचा तो केवळ धर्माच्या सात्त्विक वासनेनेच केला पाहिजे.  त्यात लोभाला थोडादेखील थारा मिळता कामा नये.  लोभाला बळी पडून खर्चिलेला पैसा जरी खरोखरच्याच धर्मकृत्यात खर्ची पडला असला तरी त्यापासून पुण्यप्राप्ती होते असे मानणे म्हणजे आपली आपणच करून घेतलेली फसवणूक होय.  हा निव्वळ मूर्खपणा आहे.  असला मूर्खपणा तू करू नकोस.  सोडत हा निव्वळ जुगार आहे.  जुगार हा अविचार आहे.  जुगार हे अनीतीचे कृत्य आहे - पाप आहे.  सोडतीत मिळालेल्या पैशाबरोबरच गोरगरिबांच्या तळतळाटाचे ओझे डोक्यावर बसत असते.  असले पापाचे ओझे डोकीवर घेऊन त्यात आनंद मानणार्‍या नरपशूचे तोंडसुद्धा पाहू नये.  हे माझे लिहीणे कदाचित तुला कठोर वाटेल, पण याबाबतीत माझी मते काय आहेत हे कळविण्याची आज आयती आलेली संधी फूकट घालवू नये, म्हणून मी अगदी जिव्हाळ्याने लिहीत आहे.

मी सार्‍या जन्मात जुगार खेळलो नाही.  जुगार, मग तो कितीही क्षुल्लक असो, तो खेळणारांचा मला मोठा तिटकारा येत असतो.  जुगारी माणसाचे तोंड दृष्टीस पडले की माझ्या पायांची तिडीक मस्तकाला झोंबते, इतकी मला जुगाराची चीड आहे.’


चतूर माधवराव
मुंबई - कोकणात घडणार्‍या रहस्यमयी घटनांवर आधारित १३ चातुर्यकथांचा संग्रह
पृष्ठे - २४४
किंमत रूपये २५०/-
समन्वय प्रकाशन / अजब डिस्ट्रीब्युटर्स, कोल्हापूर